पुणे : ‘ताउम्र राहुलजी आप यही गलती करते रहे, धूल चेहरे पे थी और आप आईना पोछंते रहे,’ अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली. राहुल गांधी यांच्या लेखाला लेखातूनच उत्तर दिले आहे. तथ्य आणि आकडेवारीसह हा लेख असून राहुल गांधी यापुढे अशा प्रकारचे बोलणे टाळतील, असेही त्यांनी सांगितले.
राहुल गांधी यांनी शनिवारी काही वर्तमानपत्रांमध्ये लिहिलेल्या लेखातून महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल आणि केंद्रीय निवडणूक आयोगावर टीका केली होती. त्यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी या लेखाला उत्तर लेखातूनच दिले जाईल, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार फडणवीस यांचा लेख रविवारी वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाला. त्यासंदर्भात महाऊर्जा इमारतीच्या उद्घाटनानंतर माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांनी रविवारी राहुल गांधी यांच्यावर टीका केली.
‘लेखाला लेखानेच तथ्य आणि आकड्यांसह उत्तर दिले आहे. त्यामुळे यापुढे राहुल गांधी अशा प्रकारचे बोलणे टाळतील. मी राहुल गांधीजींना ऐवढेच सांगू इच्छितो, ‘ताउम्र राहुलजी आप यही गलती करती रहे, धूल चेहरेपे थी और आप आईना पोछंते रहे,’ असे फडणवीस यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यातील कारागृहांमध्ये रेशन, कॅन्टीन आणि विद्युत उपकरणांच्या खरेदीत जवळपास पाचशे कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केला असून याप्रकरणी तत्कालीन तत्कालीन पोलीस महानिरीक्षक (तुरुंग) अमिताभ गुप्ता आणि तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणानंतर सुपेकर यांचे या कुटुंबाशी असलेले नाते समोर आले तसेच पुणे पोलिस दलात अतिरिक्त आयुक्त असताना सुपेकर यांनी हगवणे कुटुंबीयांना शस्त्र परवाना दिल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी सुपेकर यांची पदअवनतीने होमगार्डचे उपमहासमादेशक म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यासंदर्भात या दोघांविरोधात पुरावे असतील आणि तथ्य असेल तर चौकशी करून कारवाई केली जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
लाडकी बहीण योनजेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळविण्यासंदर्भात बोलताा ते म्हणाले, ‘अर्थसंकल्पात अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती यांच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी तरतूद करावी लागते. तशी तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली होती. हा तरतूद जास्त करण्यात आल्याचे पवार यांनी अर्थसंकल्प सादर करतानाच जाहीर केले होते. एखाद्या कामासाठी निधी राखीव ठेवला असेल आणि तो तिसऱ्याच कामासाठी वापरला तो निधी वळविला असे म्हटले जाते. त्यानुसार कोणताही निधी वळविण्यात आलेला नाही.’