पुणे : मराठा आरक्षणासाठी रविवारी शहरातून काढण्यात आलेल्या शांतता फेरीत चोरट्यांनी सोनसाखळी, मोबाइल संच, रोकड चोरल्याच्या घटना घडल्या. चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत नऊ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे उघडकीस आले असून, याप्रकरणी विश्रामबाग, स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांच्या उपस्थितीत रविवारी शहरातून शांतता फेरी काढण्यात आले. शांतता फेरीत हजारो मराठा बांधव सहभागी झाले होते. चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेऊन नागरिकांच्या गळ्यातील सोनसाखळी, रोकड, तसेच मोबाइल संच चोरून नेले. बाजीराव रस्त्यावरील फुटक्या बुरूजाजवळ एका तरुणाच्या गळ्यातील ९२ हजारांची सोनसाखळी चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत प्रणय लक्ष्मण पळसकर (वय ३२, रा. लक्ष्मीनगर, पर्वती) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पळसकर बाजीराव रस्त्यावरील कडबे आळी परिसरात रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास थांबले होेते. त्यावेळी गर्दीत चोरट्यांनी पळसकर यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून नेली. पोलीस हवालदार सुरवसे तपास करत आहेत.

हेही वाचा : हिंजवडी ‘आयटी’ नव्हे, ‘खड्डा पार्क’!

सारसबाग परिसरात दोघांच्या गळ्यातील ८५ हजारांची सोनसाखळी चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत प्रकाश सुरेश सूर्यवंशी (वय ४२, रा. सुश्रृत रेसीडन्सी, गजानन मंदिराजवळ, नऱ्हे) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सूयवंशी आणि त्यांचे परिचित दत्ता तुपे सारसबाग परिसरात रविवारी दुपारी थांबले होते. त्यावेळी चोरट्याने दोघांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून नेली.

हेही वाचा : कलावंतांची मुस्कटदाबी कितपत योग्य? अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीबद्दल ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांचे परखड सवाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्वारगेट भागातील देशभक्त केशवराव जेधे चौकात चोरट्यांनी एकाच्या खिशातील ५७ हजार ५०० रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत बाळासाहेब ज्ञानेश्वर पिलावरे (वय ५४, रा. खडकमाळ आळी, घोरपडे पेठ) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जेधे चौकात एकाच्या गळ्यातील तीन लाख ३० हजार रुपयांची सोनसाखळी चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत सत्यवान लक्ष्मण जगताप (वय ५१, रा. माळेगाव, ता. बारामती) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जगताप, त्यांचे परिचित जालिंदर सुरवसे, सुरेंद्र कदम रविवारी दुपारी शांतता फेरीत सहभागी होण्यासाठी निघाले होते. जेधे चौकात गर्दी होती. चोरट्याने जगताप यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून नेली. जेधे चौकात दीपक बापू बांदल (वय ३७, रा. वडाची वाडी, ता. हवेली ) यांच्या गळ्यातील तीन लाख ३० हजारांची सोनसाखळी चोरून नेल्याची घटना घडली. पोलीस उपनिरीक्षक राठोड तपास करत आहेत.