पुण्यातील हॉटेल वैशाली-रुपालीचे मालक जगन्नाथ शेट्टी यांचे निधन
पुणे : सत्तरच्या दशकापासून सांस्कृतिक पुण्याला नाका आणि कट्ट्यांचे छंदोव्यसन जडविणारे, नवकवी-नवकथाकार आणि प्रगटोत्सुक रंगकर्मींच्या चर्चाफडांची बैठक घडविणारे आणि नंतर राजकीय नेते, सिनेकलाकार महाविद्यालयीन युवक-युवती यांच्यासह पेन्शनर व भिशीतील महिलांचेही हक्काचे खाद्यपीठ बनलेले हॉटेल वैशाली हे पुणेकरांचे भेटस्थळ रविवारी पोरके झाले.
मराठी मनांना चार-पाच दशके चहा-कॉफीसारख्या सुलभ्य पेयांचाही महोत्सव साजरा करायची सवय लावणारे या हॉटेलचे उडपी मालक जगन्नाथ शेट्टी (वय ९०) यांचे अल्पशा आजाराने रविवारी सकाळी खासगी रुग्णालयात निधन झाले. पुण्याला देशात आणि जगात अशी चवदार ओळख मिळवून देण्यामध्ये वैशाली आणि जगन्नाथ शेट्टी यांचा सिंहाचा वाटा आहे. नावावरून दाक्षिणात्य वाटत असले तरी ७० वर्षांच्या वास्तव्याने जगन्नाथ शेट्टी पक्के पुणेकर झाले होते.
जीवनामध्ये मोठे व्हायचे असेल तर कष्टाला पर्याय नाही हे जगन्नाथ शेट्टी यांनी आपल्या कर्तृत्वाने सिद्ध केले. कर्नाटकातील उडपी येथील बैलूर या गावी एका गरीब घरात १९३२ मध्ये जगन्नाथ शेट्टी यांचा जन्म झाला. १३ व्या वर्षी घर सोडून काकासमवेत मुंबईतील हॉटेलमध्ये भांडी घासण्यापासून, फरशी पुसण्यापर्यंत पडेल ती कामे केली. वयाच्या १७ व्या वर्षी जगन्नाथ शेट्टी पुण्यात आले. १९५१ मध्ये कॅफे मद्रास सुरू केले. जे आता रूपाली या नावाने ओळखले जाते. त्यानंतर मद्रास हेल्थ होम सुरू केले. जे आता हॉटेल वैशाली या नावाने जगभर प्रसिद्ध आहे. वैशाली हॉटेल नावारूपास आणण्यामध्ये जगन्नाथ शेट्टी यांचा मोलाचा वाटा होता. त्यानंतर शेट्टी यांनी हॉटेल आम्रपाली सुरू केले. या तीनही हॉटेलला महापालिकेतर्फे क्लीन किचन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शेट्टी यांनी उदारहस्ते आर्थिक मदत करून सामाजिक कार्यात योगदान दिले होते. करोना काळात व्यवसाय बंद असताना त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक कोटी रुपयांचे अर्थसाह्य केले होते. शेठ चिमणलाल र्गोंवददास मेमोरियल ट्रस्टतर्फे उद्यमगौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
त्यांच्यामागे मुलगी, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. शेट्टी यांच्या पार्थिवावर सायंकाळी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापूर्वी त्यांचे पार्थिव वैशाली हॉटेल येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.
नाव ही ओळख…
दर रविवारी किंवा महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी वैशालीवर भेटणारे अनेक गट आहेत. गेली चाळीस वर्षे आम्ही वैशालीवर रोज भेटतो, असे सांगणारे पुणेकर फग्र्युसन रस्त्यावर हमखास भेटतात. खाणे आणि गप्पा यासाठीचे अड्डे म्हणून वैशालीची झालेली ओळख ही केवळ पुण्यापुरती मर्यादित नाही. तर, मुंबई, दिल्ली तसेच परदेशातून आलेली माणसेही वैशालीमध्ये डोकवायला विसरत नाहीत.
मद्रास कॅफे असल्यापासून म्हणजे १९७० पासून बीएमसीसीतील आम्ही विद्यार्थी तेथे जात असू. जगन्नाथशेठ आम्हा मुलांशी बोलायचे. आमच्याकडून सूचना जाणून घ्यायचे. एरवी बटाटेवडा आणि चहा घेणाऱ्या आम्हा मुलांना मसाला डोसा खाण्याची सवय शेट्टी यांनी लावली. शिवसेनेच्या आंदोलनानंतर मद्रास कॅफेचे वैशाली आणि मद्रास हेल्थ होमचे रूपाली असे नामकरण करण्यात आले.
– सुधीर गाडगीळ, प्रसिद्ध निवेदक
आम्ही नाटकातील मंडळी वैशालीवर पडीक असायचो. त्यावेळी जगन्नाथ शेट्टी यांनी हॉटेल आम्रपाली सुरू केले होते. या हॉटेलच्या उद्घाटन कार्यक्रमास निमंत्रित करून मँगो मिल्क शेक दिला होता. ‘हे हॉटेल मी व्यवसायासाठी सुरू केले आहे. तेव्हा इथे न येता तुम्ही वैशालीवर बसत जा’, असे शेट्टी यांनी सांगितले होते. ग्राहकांशी जिव्हाळ्याचे संबंध असलेले शेट्टी कितीही वेळ बसला तरी हरकत घेत नसत.
– श्रीरंग गोडबोले, प्रसिद्ध दिग्दर्शक
ग्राहकांची एकनिष्ठता…
वैशाली आणि रुपालीवर नित्यनेमाने वेगवेगळ्या प्रहरांत भेटणारे आणि तिथल्या व्यंजनांवर ताव मारणारे ग्राहक हे या हॉटेल्सप्रती एकनिष्ठ बनले. मान्यवरांपासून सामान्यांपर्यंत या ग्राहकांची बाहेर कितीही वेळ ताटकळत उभे राहण्याची तयारी दिसत राहिली. चहा-कॉफी, इडली-वडा आस्वादासह मनमुराद गप्पांतून ग्राहकांनीच शेट्टींच्या हॉटेल्सना सांस्कृतिक केंद्र बनविले. तेथे जाणे हे प्रतिष्ठेचे लक्षणही मानले गेले.
लोकप्रियतेचे गमक…
शेट्टींचे ग्राहकांशी प्रेमाने वागण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे राजकीय नेते, चित्रपट-नाट्यसृष्टीतील कलाकार, महाविद्यालयीन युवक-युवतींसह अनेकांचे वैशाली हॉटेल हे गप्पांचा फड रंगविण्यासाठी आवडते आणि हक्काचे ठिकाण झाले. मात्र एका विशिष्ट काळानंतर शेट्टींचे दर्शनही या ठिकाणाच्या चाहत्यांना होत नव्हते; पण तरीही एकाच घरातील दोन-तीन पिढ्या येथे रमण्याचा आणि बागडण्याचा वारसा चालवत राहिले.