पुणे : ‘भोगवादी वृत्तीमुळे निसर्गाचे बरेच नुकसान झाले असून, माणसाच्या अस्तित्वासाठी देवराईचे जाळे वाढणे आवश्यक आहे,’ असे मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शनिवारी व्यक्त केले.

ग्रीन हिल्स ग्रुप या संस्थेतर्फे देवराई फाउंडेशन, सह्याद्री देवराई, वनाई नैसर्गिक शेती फार्म आणि कृषी पर्यटन केंद्र या संस्थांच्या सहकार्याने देवराई संकल्पनेवर आधारित प्रदर्शन आणि प्रकल्पांचा समावेश असलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन डाॅ. गोऱ्हे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी त्या बोलत होत्या. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., पुण्याचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते, पर्यावरणसंवर्धन अधीक्षक मंगेश दिघे, ग्रीन हिल्स ग्रुपचे सदस्य अतुल वाघ, देवराई फाउंडेशनचे रघुनाथ ढोले, भूजल विज्ञान शास्त्रज्ञ उपेंद्र धोंडे, देववन संकल्पनेचे किशोर मोहोळकर, जेहलम जोशी, वनाई नैसर्गिक शेती फार्म व कृषी पर्यटन केंद्राचे सहसंचालक अथर्व वेताळ आणि सह्याद्री देवराईच्या स्मिता जगताप या वेळी उपस्थित होत्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बालगंधर्व कलादालन येथे सोमवारपर्यंत (९ जून) सकाळी नऊ ते रात्री आठ या वेळात खुल्या असलेल्या या प्रदर्शनात अतुल वाघ यांनी टिपलेली छायाचित्रे आणि जगातल्या देवराईबद्दल माहिती देणाऱ्या भित्तिपत्रकांचा समावेश आहे. घनवन संकल्पनेद्वारे आपल्या शेतात वृक्षारोपण करून शेतीसह परिसराचा कायापालट करून आर्थिक विकास साधलेल्या शेतकऱ्यांची यशोगाथा ऐकण्याची संधी या प्रदर्शनाद्वारे मिळणार आहे.