पुणे : राज्य मंडळाने जाहीर केलेल्या दहावीच्या निकालात राज्यात २११ विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण मिळवले आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा पैकीच्या पैकी गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या यंदा वाढली असून, त्यात सर्वाधिक ११३ विद्यार्थी एकट्या लातूर विभागातील आहेत. त्यामुळे शंभर टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये लातूर विभागाचे वर्चस्व यंदाही कायम राहिले असून, राज्यातील ८१ हजार ८०९ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत.
दरवर्षी दहावीच्या निकालातील गुणवंतांची चर्चा असते. त्यानुसार गेल्यावर्षी १८७ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले होते. त्यात लातूर विभागातील १२३ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले होते. तर यंदाच्या निकालातील गुणवंतांबाबत राज्य मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे विभागातील १३, नागपूर विभागातील तीन, छत्रपती संभाजीनगर विभागातील ४०, मुंबई विभागातील आठ, कोल्हापूर विभागातील १२, अमरावती विभागातील ११, नाशिक विभागातील दोन, लातूर विभागातील ११३ तर कोकण विभागातील नऊ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांचा विचार करता, ८१ हजार ८०९ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक, १ लाख ११ हजार ८७८ विद्यार्थ्यांना ८५ ते ९० टक्के, १ लाख ३९ हजार विद्यार्थ्यांना ८० ते ८५ टक्के, १ लाख ५६ हजार ३७५ विद्यार्थ्यांना ७५ ते ८० टक्के गुण मिळाले आहेत. तर ४५ ते ६० टक्के दरम्यान गुण मिळालेले २५ टक्के म्हणजेच ३ लाख ७१ हजार ८२० विद्यार्थी आहेत.
२८५ विद्यार्थ्यांना ३५ टक्के
राज्यातील २८५ विद्यार्थ्यांना निव्वळ ३५ टक्के गुण मिळाले आहेत. त्यात पुणे विभागातील ५९, नागपूर विभागातील ६३, छत्रपती संभाजीनगर विभागातील २८, मुंबई विभागातील ६७, कोल्हापूर विभागातील १३, अमरावती विभागातील २८, नाशिक विभागातील ९, तर लातूर विभागातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.