सर्वतोपरी खबरदारी घेण्याचे आवाहन पुणे : शहरातील करोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट दिसत असल्याने नागरिकांसह आरोग्य यंत्रणांवरील ताणही कमी झाला आहे, मात्र रुग्णसंख्येतील घट पाहून गाफील न राहता नागरिकांनी सर्वतोपरी खबरदारी घेण्याचे आवाहनही तज्ज्ञ डॉक्टर करत आहेत. १२ ते २० मे या आठवडय़ात प्रथमच दैनंदिन रुग्णसंख्या सातत्याने तीन हजारांपेक्षा कमी राहिली आहे. शहरात २२ ते २९ एप्रिल या आठवडय़ात संसर्गाचा दर २४ टक्के आणि त्याहून कमी नोंदवण्यात आला. ३० एप्रिल ते ५ मे या कालावधीतही एका दिवसाचा अपवाद वगळता संसर्गाचा दर २१ टक्के किं वा त्याहून कमी राहिलेला दिसला. ५ मे ते १२ मे या कालावधीत संसर्गाचा दर १० ते २० टक्के या दरम्यान राहिला, मात्र २० टक्के ची पातळी ओलांडलेली नाही. १२ ते २० मे या दरम्यान संसर्गाचा दर ९ ते २० टक्के दरम्यान राहिला, मात्र रुग्णसंख्या सातत्याने तीन हजारांपेक्षा कमी राहिल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. शहरातील प्रत्यक्ष उपचारार्थी रुग्णांच्या संख्येतही मोठी घट पाहायला मिळत आहे. भारती आयुर्वेद रुग्णालयाचे डॉ. उमेश वैद्य म्हणाले, दाखल होण्यासाठी येणाऱ्या रुग्णसंख्येचा ओघ लक्षणीय कमी झाला आहे. त्यामुळे दुसरी लाट किमान पुणे शहरात तरी आटोक्यात आली आहे हे स्पष्ट आहे. मात्र, अद्याप साथीचा धोका संपूर्ण गेलेला नाही. त्यामुळे मुखपट्टी, अंतर राखणे, वैयक्तिक स्वच्छता तसेच विषाणूजन्य आजाराची लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे या बाबी महत्त्वाच्या आहेत. जे नागरिक लसीकरणासाठी पात्र आहेत, त्यांनी लस घेणेही आवश्यक असल्याचे डॉ. वैद्य यांनी स्पष्ट के ले. दिवस चाचण्यांची संख्या रुग्णसंख्या संसर्गाचा दर १२ म १३,९८१ १९३१ १४ टक्के १३ मे १२,७३८ २३९३ १९ टक्के १४ मे १३,९०८ १८३६ १३ टक्के १५ मे १२,४०९ १६९३ १४ टक्के १६ मे ११,५३३ १३१७ १२ टक्के १७ मे ७८६२ ६८४ ९ टक्के १८ मे ९२५८ १०२१ ११ टक्के १९ मे १०,८०६ ११६४ ११ टक्के