आपण पाकिस्तानला धडा शिकवलेला आहे. मग या संघर्षात पाकिस्तानने आपले काही नुकसान केले असेल तरी ते मान्य केले तर इतका गदारोळ का?
आर्थिक, सामरिक, लष्करी इत्यादी इत्यादी मुद्द्यांवर रशियाच्या पासंगासही पुरू न शकणाऱ्या युक्रेनसारख्या देशाने एकाच दिवसात एके काळच्या महासत्तेच्या विमानांचा ताफाच्या ताफा जायबंदी करून टाकावा ही बाब अशक्य कोटीतील. एका अर्थी युक्रेनने जे केले त्याचे वर्णन रशियाचा ‘पर्ल हार्बर’ क्षण असे करता येईल. दुसरे महायुद्ध ऐन भरात असताना १९४१ साली जपानने कमालीच्या आव्हानात्मक मोहिमेत अमेरिकेच्या पर्ल हार्बरवर हल्ला करून अमेरिकी नौकांस जागच्या जागी जलसमाधी द्यावी त्याप्रमाणे ताज्या हल्ल्यात युक्रेनने आश्चर्यकारक आक्रमकता दाखवून रशियात खोलवर तब्बल चार हजार किमीची मुसंडी मारून रशियाच्या विमानांना बचावाची संधीच दिली नाही. युक्रेनने या हल्ल्यात रशियाच्या अत्यंत महत्त्वाच्या, संख्येने मोजक्या अशा अण्वस्त्र वाहक विमानांसही लक्ष्य केले. आश्चर्य युक्रेनच्या या हल्ल्याचे जसे आहे तसेच, किंबहुना त्याहूनही अधिक, ते आहे रशियाच्या कबुलीचे. युक्रेनच्या या हल्ल्यानंतर अवघ्या काही तासांत रशियाच्या वतीने जे काही झाले त्याची वस्तुस्थिती सादर केली गेली आणि ‘युक्रेनच्या ड्रोन्सनी रशियात खोलवर मुसंडी मारून आमच्या अनेक विमानांचे आणि विमानतळांचेही नुकसान केले’, अशी कबुलीही दिली गेली. या प्रामाणिकपणासाठी रशियाचे नेतृत्व कौतुकास पात्र ठरते. रशियाने हे सत्य मान्य केले आणि पाठोपाठ युक्रेनला जन्माची अद्दल घडवण्याचा इशाराही दिला. तो इशारा रशिया प्रत्यक्षात आणेलही. पण यात लक्षात घ्यावी अशी बाब म्हणजे ‘पर्ल हार्बर’ घडले तेव्हा ते घडवून आणणाऱ्या जपानपेक्षा कित्येक पट सामर्थ्यवान अमेरिकेने त्या वेळी त्याची कबुली दिली होती आणि पुढे जपानला धडा शिकवला. जे काही झाले ते कबूल करण्यात ना अमेरिकेस त्या वेळी कमीपणा वाटला ना आता रशियास तसा तो वाटतो. तेव्हा प्रश्न असा की आपले संरक्षणदल प्रमुख अनिल चौहान यांनी ताज्या संघर्षात पाकिस्तानने आपली काही विमाने पाडल्याची कबुली दिली; त्यावर इतका गहजब होण्याचे कारण काय?
युद्ध म्हटले की हे आलेच. महत्त्व असते ते शेवटी अंतिम निकालास. तो नि:संशयपणे आपल्या बाजूने लागलेला आहे आणि आपण पाकिस्तानला धडा शिकवलेला आहे. असे असताना या संघर्षात पाकिस्तानने आपले काही नुकसान केले असेल तरी ते मान्य केले तर इतका गदारोळ का? यातही एक हास्यास्पद प्रकार म्हणजे चौहान यांनी जी काही विधाने केली त्यास ‘कबुली’ म्हणावे की नाही, यावर होत असलेली चर्चा. कबुली ही गुन्ह्याची देतात आणि आपण तर काही गुन्हा केलेला नाही, सबब त्यास कबुली कसे म्हणायचे, असा प्रश्न एका वैचारिक बावळट वर्गास पडलेला दिसतो. कबुली म्हणायचे नसेल तर मग चौहान यांनी जी काही विधाने केली त्यास काय म्हणावे? खरे तर या समाजमाध्यमी वैचारिक वेठबिगारांनी ‘कबुली’ या शब्दावर घेतलेल्या भाषिक शंकेपेक्षाही एक महत्त्वाचा मुद्दा संरक्षणदल प्रमुखांनी सिंगापूर येथील मुलाखतीत मान्य केला. पाकिस्तानच्या कृतीनंतर तब्बल दोन दिवस आपणास आपले विमान दल जमिनीवर (‘ग्राउंडेड’) राखावे लागले, हा तो मुद्दा. त्याचा अर्थ असा की पाकिस्तानने आपल्या विमान दलाचे मोठे नुकसान केल्यानंतर काही काळ आपणास आपली हवाई हल्ला मोहीम स्थगित करावी लागली. त्यानंतर आपण सगळ्या मोहिमेची फेरआखणी केली आणि आपल्या विमान दलाने चमकदार कामगिरी करत पाकिस्तानात खोलवर मारगिरी करून त्यांचे अतोनात नुकसान केले. ‘‘पाकिस्तानने आपले नुकसान किती केले यापेक्षा त्या नुकसानीनंतर आपण काय केले; ही बाब अधिक महत्त्वाची ठरते’’, असे चौहान म्हणतात त्यात काहीही गैर नाही. तरीही त्यांच्या या कबुलीनिदर्शक विधानावर आपल्याकडे बरीच नाराजी निर्माण झाल्याचे दिसते. ते पाहून काही प्रश्न उपस्थित होतात.
जसे की मुळात या संघर्षात जे काही झाले त्याचा हिशेब जाहीरपणे मांडण्याचा अधिकार संरक्षणदल प्रमुख चौहान यांस दिला कोणी? केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या संदर्भात जनरल चौहान यांस मुखत्यारपत्र दिले होते काय? तशी शक्यता कमीच. कारण संरक्षणमंत्र्यांचा एकूण आवाका आणि तूर्त त्यांस दिले गेलेले अधिकार पाहता राजनाथ सिंह यांच्या वतीने असे काही केले गेले असण्याची शक्यता नाही. म्हणजे मग राहता राहिले पंतप्रधान कार्यालय वा खुद्द पंतप्रधान. देशाच्या सर्वोच्च नेत्याची परवानगी असल्याखेरीज जनरल चौहान स्वत:च्या हिमतीवर इतके विधान करू शकतील काय? तसे त्यांनी केले असेल काय? इतकी स्वतंत्र प्रज्ञा त्यांच्या ठायी आहे काय? आणि तशी ती असूनही त्यांना या पदावर नेमण्याचा मोठेपणा केंद्राने दाखवला काय? यापेक्षाही अधिक महत्त्वाचा मुद्दा असा की ही कबुली द्यायचीच होती तर त्यांनी ‘रॉयटर्स’सारख्या ‘पाश्चात्त्यधार्जिण्या’… आणि म्हणून ‘भारत-विरोधी’… वृत्तसेवेची निवड का बरे केली? अनेक भारतीय वृत्तवाहिन्यांनी एक चकार शब्द न काढता, कोणताही उलट प्रश्न न विचारता जनरल चौहान यांचे विधान दिवस-दिवस ‘चालवले’ असते आणि ‘‘पाहा भारतीय लोकशाही किती प्रामाणिक, पारदर्शी आहे’’, त्याची दवंडीही पिटली असती. म्हणजे अलीकडे विविध विक्री योजनांत ‘वन प्लस वन’, एकावर एक मोफत काय काय दिले जाते, तद्वत या विधानाच्या प्रसारणाबरोबर लोकशाही प्रचारही त्यांनी मोफत केला असता आणि पाकिस्तानला त्याची जागा दाखवून दिली असती. परंतु जनरल चौहान यांनी रॉयटर्सची निवड केल्याने हे काहीच झाले नाही. भारतीय वाहिन्यांची ही संधी हुकली आणि बातम्यांतील निवडक तुकडे समाजमाध्यमी फिरते ठेवण्याचा राष्ट्रप्रेमी उद्याोग वैचारिक वेठबिगारांसही करता आला नाही. आणि परत त्यांनी हे विधान केले ते सिंगापुरात? तेही ‘शांग्रिला डायलॉग’ या चर्चेच्या निमित्ताने? ते का?
तसे पाहू गेल्यास जनरल चौहान हे मूळचे पायदळाचे अधिकारी. त्यांची हयात गेली पायदळात. केंद्राने त्यांना निवृत्योत्तर या पदासाठी पाचारण केले. याआधीचे संरक्षणदल प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या अपघाती निधनानंतर हे पद रिक्त झाले आणि तेथे जनरल चौहान यांस नेमले गेले. या पदावरील व्यक्ती संरक्षणदल प्रमुख असली तरी लष्करी विमानांच्या पडझडीविषयी भाष्य करण्याची संधी त्यांनी हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग यांस द्यावयास हवी होती. त्यांनी गेल्याच आठवड्यात भारतीय उद्याोग महासंघाच्या बैठकीत संरक्षणमंत्र्यांच्या साक्षीने सरकारी मालकीच्या कंपन्यांचे संरक्षण साहित्याच्या उत्पादनाबाबत वाभाडे काढले. सिंग यांनी याआधीही अशा प्रकारची टीका केलेली होती. यावरून त्यांचा स्पष्टवक्तेपणाचा लौकिक दिसून येतो. असे असताना भारत-पाक संघर्षात आपली काही विमाने पाडली गेली असतील, हवाई दलाचे नुकसान झाले असेल तर त्यावर भाष्य करण्याचा पहिला अधिकार त्यांचा होता. जनरल चौहान यांच्या वक्तव्याने एअर चीफ मार्शल सिंग यांची अडचण झाली; त्याचे काय?
सबब प्रश्न असा की जनरल चौहान यांच्या या कबुलीने नक्की काय साधले? हा संघर्ष संपून, आपल्या पंतप्रधानांचे जवळचे मित्र अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणतात त्याप्रमाणे त्यांच्या पुढाकाराने अमलात आलेल्या शस्त्रसंधीस इतके दिवस उलटल्यानंतर या अशा कबुलीचे कारणच काय? कबुली नाही तर नाही, पण आपले सरकार निदान या कबुलीची कारणे तरी सांगेल; ही आशा.