टिटवाळा ते २७ गावातील हेदुटणे या ३० किलोमीटर लांबीच्या बाह्यवळण रस्त्याच्या टप्प्यामधील महत्वाचा डोंबिवलीतील मोठागाव ते कल्याण मधील दुर्गाडी किल्ला दरम्यानच्या सात किमी लांबीच्या महत्वपूर्ण टप्प्याच्या कामाला लवकरच गती मिळणार आहे. या कामाची ५३१ कोटी ६८ लाख रस्ते कामाची निविदा प्रक्रिया मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सुरू केली आहे.

मोठागाव ते दुर्गाडी किल्ला टप्पा पूर्ण करण्यासाठी गेल्या दीड वर्षापूर्वी दुर्गाडी, डोंबिवलीतील मोठागाव मधील सुमारे ५० चाळी, गरीबाचापाडा, गणेशनगर ठाकुर्ली भागातील अतिक्रमणे हटविण्यात आली होती. मोठागाव ते दुर्गाडी सात किमीच्या पट्ट्यात डोंबिवलीतील ठाकुर्ली, शिवाजीनगर, गावदेवी, चोळे, कचोरे, कांचनगाव या गावांमधील २२६ जमीन मालकांच्या जमिनी वळण रस्त्याने बाधित होत आहेत. यामधील ११६ जणांनी पालिकेला वळण रस्त्यासाठी संमती पत्रे दिली आहेत. ६१ मालकांची संमती पत्रे पालिकेच्या ताब्यात नव्हती. ४९ जणांच्या जमिनी अधिग्रहीत करावयाच्या होत्या. वळण रस्त्याने बाधित शेतकऱ्यांना कल्याण डोंबिवली पालिकेकडून जमिनीच्या क्षेत्राप्रमाणे विकास हक्क हस्तांतरण दिला जाणार आहे. जोपर्यंत रस्त्यासाठी जमिनीचे १००अधिग्रहण होत नाही तोपर्यंत निविदा प्रक्रिया सुरू करणार नाही, अशी ताठर भूमिका ‘एमएमआरडीए’च्या अधिकाऱ्यांनी घेतली होती.

हेही वाचा: ठाणे : निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदार काळ्या यादीत; महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची कारवाई

जमिनीचे अधिग्रहण पालिकेने करून द्यायचे आणि प्राधिकरणाच्या ताब्यात ते भूक्षेत्र द्याचे आहे. टिटवाळा ते दुर्गाडी दरम्यान १०० टक्के अधिग्रहण नसताना प्राधिकरणाने रस्ते काम सुरू केले. मधल्या टप्प्यातील बांधकामे काढून दिली जातील असे आश्वासन पालिकेने प्राधिकरण अधिकाऱ्यांना दिले होते. टिटवाळा, गंधारे ते दुर्गाडी वळण रस्त्याचे काम पूर्ण होऊनही मधली बांधकामे काढण्यात पालिका अधिकाऱ्यांना यश आले नाही. पाच ते सहा वर्षापासून रस्ता सुरू असुनही तो पूर्ण का केला जात नाही. हा निधीचा अपव्यय असल्याचा ठपका महालेखापालांनी प्राधिकरण अधिकाऱ्यांवर ठेवला होता. महालेखापालांचे नाहक ताशेरे अंगावर घेण्यापेक्षा पहिले १०० टक्के भूसंपादन करुन द्या मगच मोठागाव ते दुर्गाडी रस्त्याचे काम सुरू करतो, अशी भूमिका प्राधिकरण अधिकाऱ्यांनी घेतली होती.

हेही वाचा: ठाणे जिल्ह्यातही हुडहुडी; संपूर्ण आठवड्यात तापमानात घट

अतिक्रमणे काढून देऊन दीड वर्ष उलटले तरी प्राधिकरण अधिकारी वळण रस्ते काम सुरू करत नसल्याने पालिका अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता होती. खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी अनेक वेळा एमएमआरडीएचे आयुक्त एस. आर. व्ही. श्रीनिवास यांची अनेक वेळा भेट घेऊन मोठागाव-दुर्गाडी रस्ते काम सुरू करण्याची मागणी केली होती. ९० टक्क्याहून अधिक भूसंपादन झाल्याची माहिती मिळाल्यानंतर प्राधिकरणाने मोठागाव-दुर्गाडी वळण रस्त्याचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन ठेकेदार नियुक्त झाला की तात्काळ हे काम हाती घेतले जाणार आहे, असे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्याने सांगितले.

टिटवाळा, कल्याणच्या प्रवाशांना फायदा

मोठागाव-दुर्गाडी रस्ता माणकोली उड्डाण पूलाला जोडण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईतून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनने डोंबिवलीत येणारा कल्याण, टिटवाळा येथील प्रवासी माणकोली पुलावरुन मोठागाव येथे डावे वळण घेऊन डोंबिवलीतील गरीबाचापाडा, गणेशनगर, ठाकुर्ली खाडी किनारा, पत्रीपूल, दुर्गाडी येथून इच्छित स्थळी जाईल. ठाकुर्ली पश्चिम रेल्वे समांतर रस्त्यालगत काही भाग उन्नत तर काही भाग जमिनीलगत बांधण्यात येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भोपरमध्ये विरोध

मोठागाव, कोपर, आयरे, भोपर, काटई, कोळे, हेदुटणे या आठ किमीचा टप्पा स्थानिकांच्या विरोधामुळे रखडला आहे. मागील सात वर्षापासून भोपर भागातील भूमाफिया या रस्ते कामासाठी सर्व्हेक्षण, भूसंपादन करुन देण्यास विरोध करत आहेत. मतांच्या राजकारणामुळे या महत्वाच्या विषयाकडे राजकीय मंडळी दुर्लक्ष करत असल्याचे समजते.