नाटय़गृहातील वातानुकूलन यंत्रणाही थंडावली
कल्याणमधील महापालिकेच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात नाटक पाहण्यासाठी गेलेल्या रसिक प्रेक्षकांना नाटकाचा अस्वाद घेताना खुच्र्यामधील ढेकणांशी अधिक काळ सामना करावा लागत आहे. नाटय़गृहातील खुच्र्यामध्ये विराजमान होताच ढेकणांच्या टोळ्या रसिकांना अक्षरश हैराण करून सोडत आहेत. दरम्यान, नाटय़गृहात गर्दी वाढताच उपलब्ध वातानुकूलन यंत्रणाही धापा टाकू लागते. त्यामुळे उकाडय़ामुळे रसिक हैराण होऊ लागले आहेत.
कल्याण शहरात मध्यवर्ती ठिकाणी नाटय़गृहाची उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे कल्याण आणि डोंबिवलीतील रसिक अत्रे रंगमंदिरातील नाटकांना मोठी गर्दी करत असतात. गेल्या काही महिन्यांपासून नाटय़गृहातील गैरसोयी वाढत आहेत. गेल्या आठवडय़ात ‘ती फुलराणी’ नाटय़प्रयोगावेळी वातानुकूलन यंत्रणा थंडावल्याने नाटकाचा प्रयोग प्रेक्षकांनी रोखून धरला होता. त्यामुळे रंगमंदिरातील असुविधांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. रंगमंदिरातील स्वच्छतागृहातील भांडी फुटली आहेत. बेसिनला जोडलेल्या वाहिन्या तुटल्या असल्याने सगळे पाणी पायावर पडून, इतस्तत: पसरते. पाणीकपातीचा फटका रंगमंदिराला बसला आहे. अनेक वेळा स्वच्छतागृहात पाणी नसते. स्वच्छतागृहे अनेक वेळा तुंबलेली असतात. त्यामुळे सर्वत्र दरुगधी पसरते. रंगमंचामागील नाटय़कलाकारांना बसण्यासाठी असलेल्या जागा तुटपुंज्या आणि गैरसोयीच्या आहेत, अशा तक्रारी पुढे येत आहेत. नाटय़गृहात कुबट वातावरण जाणवते, असे काही रंगकर्मीनी सांगितले.
‘आमचे नाटय़प्रयोग नियमित या रंगमंदिरात होत असतात, याविषयी आम्ही महापालिका प्रशासनाला कळविले तर ही मंडळी पुन्हा आम्हाला त्रास देऊ लागतात. तारखा देत नाहीत. त्यामुळे या प्रकरणात न पडलेले बरे असे आम्हाला वाटू लागले आहे, अशी प्रतिक्रिया एका नाटय़निर्मात्याने व्यक्त केली. एका नाटय़निर्मात्याने समाजमाध्यमाच्या माध्यमातून बिकट परिस्थिती कथन केली होती.
अत्रे, सावित्रीबाई रंगमंदिर ही ना नफा ना तोटा तत्त्वावर पालिकेकडून चालविली जातात. ही दोन्ही नाटय़गृहे तोटय़ात चालतात. उत्पन्नापेक्षा या दोन्ही नाटय़गृहांचा खर्च अधिक असल्याने पालिका या दोन्ही नाटय़गृहांकडे पांढरा हत्ती म्हणून पाहत आहे. नाटय़गृहे सुरळीत चालावीत तसेच तेथे चांगल्या सुविधा मिळाव्यात म्हणून प्रशासन दरवर्षी अर्थसंकल्पात तरतूद करते. पण नाटय़गृहांना वर्षांनुवर्षे ठरावीक दलाल अधिकाऱ्यांचा विळखा पडल्याची चर्चा आहे. ठरावीक ठेकेदार, त्यांचे महापालिका कर्मचाऱ्यांशी असलेले लागेबांधे यामुळे नाटय़गृहाची दैना उडाली आहे, अशी चर्चा आहे. अत्रे रंगमंदिरातील वातानुकूलन यंत्रणा जुनी आहे. ती बदलणे आवश्यक आहे. तशीच अवस्था डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले रंगमंदिरातील वातानुकूलन यंत्रणेची आहे. परंतु, पालिकेचा विद्युत विभाग पूर्ण क्षमतेने या दोन्ही प्रकल्पांकडे लक्ष देत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्याचा फटका रंगमंदिरात येणाऱ्या प्रेक्षकांना बसत आहे.
पालिकेच्या रंगमंदिरात वर्षांनुवर्षे ठरावीक अधिकारी आणि ठेकेदार काम करीत असल्याची माहिती मिळाली आहे. ही यंत्रणा जर रसिकांना सेवा देण्यापेक्षा करदात्यांच्या पैशातून स्वत:चे भले करण्यात धन्यता मानत असेल तर, कर्तव्यकठोर आयुक्तांनी अशा कर्मचारी व ठेकेदारांना अत्रे, सावित्रीबाई रंगमंदिरातून दूर केले पाहिजे.
-अरविंद बुधकर, रसिक, कल्याण</strong>
रंगमंदिरातील डागडुजी व देखभालीसाठी अर्थसंकल्पात तरतदू करण्यात आली आहे. त्या निधीचा वापर करून प्रेक्षकांच्या सूचनांची दखल घेऊन रंगमंदिरात अत्यावश्यक सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
-गणेश बोराडे, व्यवस्थापक