ठाणे : ठाणे शहरात गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेली टोईंग व्हॅनची सुविधा सुरू करण्याचा निर्णय ठाणे वाहतूक पोलिसांनी घेतला असून या निर्णयाला दक्ष नागरिकांनी कडाडून विरोध केला आहे. त्यापाठोपाठ आता भाजप आणि ठाकरे गटानेही याप्रकरणात उडी घेत टोईंग व्हॅन विरोधात भुमिका जाहीर केली आहे. तसेच शहरात बेदरकारपणे चालविण्यात येणाऱ्या रिक्षांवर कारवाई करण्याची मागणी भाजपने केला आहे.

ठाणे शहरात पार्किंगची पुरेशी सुविधा नसल्यामुळे नागरिक रस्त्यावर वाहने उभी करतात. शहरात अनेक ठिकाणी अरुंद रस्ते असून त्याठिकाणी पार्किंग केलेल्या वाहनांमुळे कोंडी होते. त्यामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण दुचाकींवर वाहतूक पोलिस टोईंग व्हॅनद्वारे कारवाई करतात. या वाहनाद्वारे दुचाकी उचलून नेल्या जातात. मात्र, रस्त्यावर पार्क केलेल्या चारचाकी वाहनांवर पोलिस केवळ जॅमर लावण्याची कारवाई करतात. ते वाहन बाजूला केले जात नसल्यामुळे कोंडी कायम असते.

यामुळे केवळ दुचाकी वाहनांवर कारवाई होताना दिसून येते. या कार्यपद्धतीवर टिका होत होती आणि याबाबत नागरिकांक़डून तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यातच टोईंग व्हॅनच्या कामाची मुदतही संपुष्टात आली होती. यामुळे वाहतूक पोलिसांनी टोईंग व्हॅन बंद केली होती. दरम्यान, गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेली टोईंग व्हॅनची सुविधा सुरू करण्याचा निर्णय ठाणे वाहतूक पोलिसांनी घेतला असून या निर्णयाला दक्ष नागरिक अजय जया आणि संगम डोंगरे यांनी विरोध दर्शविला होता. त्यापाठोपाठ टोईंग व्हॅन विरोधात भाजपचे माजी नगरसेवक सुनैश जोशी, मृणाल पेंडसे यांनी पोलिस उपायुक्त पंकज शिरसाठ यांची भेट घेऊन टोईंग व्हॅनविरोधात निवदेन दिले. तसेच शहरात वाहतूकीच्या इतर समस्येकडे लक्ष देण्याची मागणी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरात बेदरकारपणे चालविण्यात येणाऱ्या रिक्षांवर कारवाई तसेच कोंडीस कारणीभूत ठरत असलेले अनेक ठिकाणचे दुभाजक काढण्याची मागणी त्यांनी केली. तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्यांनीही पोलिस उपायुक्त पंकज शिरसाठ यांची भेट घेऊन टोईंग व्हॅनविरोधात निवदेन दिले. त्यामुळे टोईंग व्हॅनविरोधात आता राजकीय पक्षही मैदानात उतरल्याचे चित्र आहे.