जयेश सामंत/ कुलदीप घायवत

मुंबई / ठाणे : गणेशोत्सवाच्या ओढीने मोठय़ा संख्येने कोकणात जाणाऱ्यांच्या सोयीसाठी यंदा मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांतून ३,८७४ एसटी बस आणि सहा मोफत रेल्वेगाडय़ा सोडण्यात आल्या आहेत. कोकणवासियांना ही सुविधा पुरवून त्यातून जनसंपर्क वाढवण्यात यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाने बाजी मारली आहे.

मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांचे खासदार पुत्र श्रीकांत यांच्या माध्यमातून ठाण्यातून जवळपास एक हजार एसटी बसगाडय़ा कोकणात सोडण्यात आल्या. विशेष म्हणजे, शिंदे यांच्यावतीने करण्यात आलेल्या ‘घाऊक’ एसटी आरक्षणामुळे अन्य राजकीय पक्षांच्या वाटय़ाला पुरेशा गाडय़ाही आल्या नाहीत. गणेशोत्सवासाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येने चाकरमानी कोकणात जातात. या प्रवाशांचा वाहतूक व्यवस्थेवर मोठा भार येणार असल्याने आधीपासूनच विशेष गाडय़ांचे नियोजन केले जाते. यावर्षी गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाच्या ३ हजार ५३ बसचे सांघिक आरक्षण (ग्रुप आरक्षण) करण्यात आले आहे तर ८२१ जादा बस आरक्षित करण्यात आल्या. त्यानुसार १५ ते १८ सप्टेंबर या कालावधीत ३८७४ बसगाडय़ा मुंबई, ठाणे, पालघरमधून कोकणात धावल्या. यामध्ये यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचेच प्राबल्य दिसून आले.

हेही वाचा >>>टिटवाळ्यातील श्री महागणपती हॉस्पिटल विस्ताराच्या वाटेवर!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गणेशोत्सवानिमीत्त ठाणे विभागात राज्य परिवहन सेवेच्या एक हजार ९६४ बसगाडय़ा कोकणात गट नोंदणीने सोडण्यात आल्या. यापैकी सर्वाधिक बसगाडय़ा कल्याण-डोंबिवली आणि ठाणे शहरातून होत्या. या सर्व बसगाडय़ा अहमदनगर, धुळे, धाराशीव, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर यासह राज्यातील विविध भागातून ठाण्यातून चालविल्या जात होत्या. याशिवाय ठाणे विभागातील मुळच्या २५० एसटी गाडय़ा कोकणात वळविण्यात आल्या. ठाण्यातील खोपट, डोंबिवली, कल्याण , विठ्ठलवाडी बस आगारातून १२०० पेक्षा अधिक एस.टी बसेस कोकणात रवाना झाल्या. यापैकी एक हजारापेक्षा अधिक बसेस या शिंदे पिता-पुत्रांमार्फत सोडण्यात आल्याची माहिती आहे.