बदलापूरः ग्रामीण भागात आणि विशेषतः आदिवासी, कातकरी समाजाची जीवनपद्धती, खाद्य संस्कृती, सोबतच रानभाज्या, त्या कशा दिसतात, त्या कशा बनवल्या जातात अशा सर्व गोष्टींची माहिती मिळवत संवाद साधण्यासाठी मुरबाड तालुक्यात हिरव्या देवाची यात्रा आयोजीत केली जाते. यंदा ५ जून रोजी मुरबाडच्या केवारवाडी आणि १५ जून रोजी मासले बेलवापाडा येथे दोन टप्प्यात हिरव्या देवाची यात्रा आयोजीत केली जाणार आहे. यंदाच्या यात्रेत स्थानिक बी बियाणे संकलन करणाऱ्या बांधवांशी संवाद साधण्याचा प्रमुख हेतू आहे. शहरातल्या नागरिकांनी मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

शहरवासियांचे आणि विशेषतः तरूणांची निसर्गाशी नाते दुरावले आहे. त्यात आदिवासी आणि कातकऱ्यांच्या विश्वापासून कित्येक जण दूर आहेत. आदिवासी बांधवांनी वनोपजापासून तयार केलेली कलाकुसर, त्यांची खाद्यसंस्कृती, रानभाज्या, त्यांची बनवण्याची पद्धत, निसर्ग रांगोळी यांचा अनुभव घेता यावा. तसेच जंगल आणि पर्यावरणाविषयी असलेले ऋणानुबंध दृढ व्हावेत या संकल्पनेतून जागतिक वन दिनाचे औचित्य साधत मुरबाड तालुक्यातील आदिवासी भागात हिरव्या देवाची यात्रा आयोजित केली जाऊ लागली. श्रमिक मुक्ती संघटना, वन निकेतन, रॉ, इनटॅक ठाणे, वन विभाग आणि अश्वमेध प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाही गुरूवारी हिरव्या देवाची यात्रा आयोजीत करण्यात आली आहे. यंदा दोन टप्प्यात ही यात्रा होणार असल्याची माहिती श्रमिक मुक्ती संघटनेच्या इंदवी तुळपुळे यांनी ही दिली.

५ जून रोजी मुरबाडच्या वेशीवर असलेल्या केवारवाडी येथे ही यात्रा संपन्न होईल. यजमान केवारवाडी गावात ग्रामस्थांनी सांभाळलेली देवराई, जंगल आहे. काळू नदीच्या बाजूला हा समृद्ध भाग आहे. येथील आदिवासी बांधव मुख्यतः मधाचा व्यवसाय चांगला करतात. या जंगली मधाला शहरात मोठी मागणी असते. यंदाच्या हिरव्या देवाच्या यात्रेतही दरवर्षीप्रमाणे निसर्ग रांगोळी, रानभाज्या प्रदर्शन, संस्कृतीचे प्रदर्शन, रानभाज्या विक्री, वनोपज वस्तूंची विक्री असेल. रानभाज्या स्पर्धेत चांगल्या भाज्यांना बक्षिसे मिळतील.

तर दुसऱ्या टप्प्यात १५ जून रोजी मासले बेलपाडा येथे अश्वमेध भवन येथे हिरव्या देवाची यात्रा भरेल. यातही रानभाज्या पाहायला आणि चाखायला मिळतील. कल्याण तालुक्यातील वरप येथील सेक्रेड हार्ट स्कुलच्या वतीने देशी बियाणे गोळा करण्याचा प्रयोग राबवला जातो आहे. त्याचेही प्रदर्शन येथे असेल. प्रामुख्याने कातकरी समाजाची खाद्य संस्कती दाखवण्याता प्रयत्न येथे केला जाईल, अशी माहिती अश्वमेध प्रतिष्ठानच्या अविनाश हरड यांनी दिली आहे. येथे मल्लखांबही उभारला जाणार असून पद्मश्री उदय देशपांडे यांच्या हस्ते याचे अनावरण होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कसे जाणार या हिरव्या देवाच्या यात्रेसाठी पहिल्या टप्प्यात केवारवाडी येथे जावे लागणार आहे. केवारवाडी कल्याण अहिल्यानगर महामार्गावर टोकावडेपासून अवघ्या पाच किलोमीटरवर कुडशेत गाव आहे. जवळच केवारवाडी आहे. तर मासले बेलपाडा बदलापूर मुरबाड मार्गावर असून येथे जाण्यासाठी बदलापुरहून बसचा पर्याय आहे. या कार्यक्रमासाठी मोफत नोंदणी करण्याचे आवाहन अश्वमेध प्रतिष्ठानने केले आहे.