डोंबिवली – डोंबिवलीतील मुंजाजी शेळके (७०) या वयोवृध्द रिक्षा चालकाच्या रिक्षेचा एका मोटार कारला मंगळवारी संध्याकाळी धक्का लागला. यावेळी मोटार कार चालक मोठागाव मधील रहिवासी आकाश एकनाथ म्हात्रे यांनी शेळके यांना मारहाण करत स्वताच्या घरी नेले. त्यांना डांबून ठेवले. भरपाई म्हणून रिक्षा चालकाकडे दोन लाखाची मागणी केली. यावेळी मध्यरात्रीच्या सुमारास सुटका झाल्यानंतर मानसिक तणावाखाली आलेल्या मुंजाजी यांनी घरी येऊन आत्महत्या केली, असा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
मुंजाजी शेळके (७०) हे ठाकुरवाडी भागात कुटुंबीयांसह राहतात. आकाश एकनाथ म्हात्रे असे मारहाण करणाऱ्या कार चालकाचे नाव आहे. ते मोठागाव रेतीबंदर भागात राहतात. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी संध्याकाळी मुंजाजी शेळके रिक्षेने प्रवासी वाहतूक करत होते. मोठागाव भागात आल्यानंतर त्यांच्या रिक्षेचा धक्का आकाश म्हात्रे यांच्या कारला लागला. संतप्त झालेल्या आकाश यांनी वृध्द रिक्षा चालक मुंजाजी यांना मारहाण केली.
त्यांना रिक्षेसह स्वताच्या घरी नेले. तेथे त्यांना डांबून मारहाण केली. त्यांच्याकडे कारच्या नुकसानीबद्दल भरपाई म्हणून दोन लाख रूपयांची मागणी केली. ही रक्कम दिल्याशिवाय रिक्षेचा ताबा देणार नाही, असा पवित्रा आकाश यांनी घेतला. एवढी रक्कम कोठून द्यायची या विवंचनेत मुंजाजी होते, असे कुटुंबीयांनी सांगितले.
मध्यरात्री तीन वाजण्याच्या दरम्यान आकाश म्हात्रे यांनी मुंजाजी शेळके यांना घरातून सोडले. ते आपल्या ठाकुरवाडीतील घरी आले. ते मानसिक तणावाखाली होते. त्यांनी कुटुंबीयांना घडला प्रकार सांगितला. त्यानंतर कुटुंबीय झोपेत असताना घरातील छताला गळफास घेऊन त्यांनी आत्मह्त्या केली. या सगळ्या प्रकाराला कार चालक जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी शेळके कुटुंबीयांनी केली आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आकाश म्हात्रे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेची माहिती मिळताच रिक्षा संघटनेचे नेते दत्ता माळेकर, प्रमोद गुरव, किशोर सरखांदे, बबलू तिवारी, रवी जाधव, जयनाथ यादव, संतोष आतकारे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. मृत रिक्षा चालकाच्या कुटुंबीयांना न्याय मिळाल पाहिजे. याप्रकरणातील दोषीवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली.
रिक्षा चालक मुंजाजी शेळके यांच्या रिक्षेचा धक्का आकाश एकनाथ म्हात्रे यांच्या कारला लागला. भरपाई म्हणून आकाश यांनी दहा हजार रूपयांची मागणी मुंजाजी यांच्याकडे केली. मुंजाजी यांची रिक्षा आकाश यांनी घरी नेली. यानंतर आलेल्या मानसिक तणावातून रिक्षा चालकाने आत्महत्या केल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे. याप्रकरणाची गुन्हा नोंद करण्यात आला आहे. – सुहास हेमाडे, साहाय्यक पोलीस आयुक्त