मध्य रेल्वेच्या कल्याण ते सीएसएमटी दरम्यानच्या विविध रेल्वे स्थानकांवर प्रवासी म्हणून जाऊन प्रवाशांच्या हातामधील, पिशवीतील मोबाईल चोरणाऱ्या दोन जणांना कल्याण रेल्वे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बुधवारी अटक केली. यामधील एक जण अल्पवयीन आहे. त्यांच्याकडून चोरीचे १४ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती कल्याण रेल्वे गुन्हे शाखेचे साहाय्यक पोलीस निरीक्षक ए. सी. शेख यांनी दिली.
बालाजी मस्से असे अटक आरोपीचे नाव आहे. तो सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर विविध रेल्वे पोलीस ठाण्यात चोरीचे आठहून अधिक गुन्हे दाखल आहेत. तो कल्याणजवळील कांबा गावात राहतो. त्याचा एक साथीदार अल्पवयीन आहे. त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.
बालाजी मस्सेकडून ११ मोबाईल, अल्पवयीन चोराकडून तीन मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत. बालाजी त्याच्या साथीदारासह प्रवासी म्हणून रेल्वे स्थानकात सकाळ, संध्याकाळ यायचा. या वेळेत प्रवासी कामावर जाण्याच्या किंवा घरी जाण्याच्या गडबडीत असतात. प्रवाशांच्या या गडबडीचा गैरफायदा उठवत बालाजी प्रवाशांवर पाळत ठेऊन हातातील, पिशवीमधील मोबाईल हिसकावून पळून जात होता. कल्याण व इतर रेल्वे स्थानकांमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये तो चोरी करताना कैद झाला होता. तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते.
मध्य रेल्वेच्या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांचे मोबाईल चोरणारा एक भामटा कल्याणजवळील म्हारळ गावालगतच्या कांबा गावात राहतो अशी माहिती पोलीस अधिकारी शेख यांना मिळाली. त्यांनी दोन दिवस कांबा गावात पाळत ठेवली. मिळालेल्या माहितीच्या आधारे कांबा गावातील एका घरातून सापळा लावून बालाजी मस्सेला अटक केली. बालाजाची चौकशी केल्यावर त्याने त्याच्या अल्पवयीन साथीदाराची माहिती पोलिसांना दिली. त्यालाही अटक केली आहे. कल्याण रेल्वे स्थानकात गेल्या काही महिन्यांपासून प्रवाशांचे मोबाईल चोरण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पोलिसांनी मोबाईल चोरांना पकडण्याची विशेष मोहीम सुरू केली आहे.
बालाजीच्या चौकशीतून रेल्वे स्थानकातील अनेक चोरीचे प्रकार उघड होण्याची शक्यता, तपास अधिकारी शेख यांनी व्यक्त केली.