ठाणे – मध्य रेल्वेच्या मुंब्रा आणि दिवा स्थानकात धावत्या लोकल गाडीमधून प्रवास करणारे सुमारे १३ जण पडल्याची घटना सोमवारी सकाळच्या सुमारास घडली. या अपघातामुळे कल्याण पलीकडील भागातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित केले जात आहेत. या भागातील प्रवाशांनी केवळ रेल्वेवर का अवलंबुन राहावे ?, प्रवाशांसाठी सार्वजनिक वाहतुकीचे व्यवस्था का केली जात नाही ? असे प्रश्न उपनगरीय रेल्वे महिला प्रवासी महासंघाच्या अध्यक्षा लता अरगडे यांनी उपस्थित केले आहेत.
मध्य रेल्वेच्या दिवा-मुंब्रा रेल्वेस्थानकांच्या दरम्यान सोमवारी सकाळच्या सुमारास रेल्वे अपघात झाला आहे. कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला (सीएसएमटी) जाणाऱ्या लोकल रेल्वेमधून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. सकाळी ९.२० वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. लोकलमधील प्रचंड गर्दीमुळे काही प्रवासी डब्याच्या दरवाज्यात लटकत उभे होते. त्याचवेळी बाजूने जाणारी लोकल या प्रवाशांना घासून गेली. यामध्ये अंदाजे १३ प्रवासी मुंब्रा रेल्वे स्टेशन जवळ लोकलमधून खाली पडले. या अपघातामुळे कसारा – कर्जत भागातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या समस्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. यावर लोकसत्ताशी बोलत असताना उपनगरीय रेल्वे महिला प्रवासी महासंघाच्या अध्यक्षा लता अरगडे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
काय आहे म्हणणे
कसारा- कर्जत मार्गावर तिसऱ्या चौथ्या मार्गिकेचे काम हे ढिसाळ पद्धतीने सुरू आहे. ते पुर्ण झाले तर रेल्वे गाड्यांची संख्या वाढणार आहे. आज राजकीय नेत्यांना वाटले तर अटल सेतू, समृद्धी महामार्ग पुर्ण होतो. मात्र ठाण्याच्या पुढील जे प्रकल्प आहेत ते १२ वर्षाहुन अधिक काळ रखडतात. त्याच्यामुळे पुढील नियोजन डळमळीत होत जाते.
वाढलेल्या गर्दीला उपाय म्हणुन, जोपर्यंत प्रकल्प पुर्ण होत नाही तोपर्यंत कार्यालयीन वेळेमध्ये बदल करणे हा आहे. तरच, लोकांचा जीव वाचु शकतो. तसेच पश्चिम मार्गावर रेल्वेचे, मेट्रो आणि रस्त्यांचे विविध प्रकल्प सुरू आहेत. तसेच ठाणे पुढील प्रवाशांसाठी सार्वजनिक वाहतुकीचे व्यवस्था का केली जात नाही ? येथील प्रवाशांनी फक्त रेल्वेवर का अवलंबुन राहावे ? होत असलेले अपघात हे रेल्वे गाड्यांची संख्या वाढवल्याने कमी होणार नसून त्यासाठी इतरही उपाययोजना तितक्याच गरजेचे आहेत असे स्पष्ट मत त्यांनी मांडले.