कल्याण : पारसिक बोगदामार्गे अतिजलद लोकल मुंबईला धावण्याचे थांबल्यानंतर या लोकल जुन्या मुंब्रा रेल्वे स्थानकात बांधलेल्या नव्या रेल्वे मार्गिकेतून धावतात. या नव्या रेल्वे मार्गिकांच्या ठिकाणी मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ आणि मुंब्रा ते ठाणे दरम्यानच्या रेतीबंदर खाडी मार्गावर मोठे वळण आहे. या वळणावर अतिजलद लोकल धावत असेल तर ती धोकादायक ठरू शकते असे प्रवासी संघटनांकडुन सांगितले जात होते. सोमवारी झालेला अपघात या वळणांचा परिणाम असल्याची चर्चा आता प्रवाशांमध्ये सुरू झाली आहे.
नोकरीच्या ठिकाणी वेळेत पोहचण्याची प्रत्येक प्रवाशाची धडपड असते. यासाठी कसारा, कर्जत, खोपोली भागातून सकाळी साडेसात ते साडेआठ वेळेत टिटवाळा, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर दरम्यानचे प्रवासी या अतिजलद लोकल पकडून मुंबईत वेळेत जाण्याचा प्रवास करतात. या लोकलनी कल्याण, डोंबिवली थांबा घेतल्यानंतर त्या थेट ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर आणि भायखळा घेतल्यानंतर थेट सीएसएमटी विनाथांबा धावतात. त्यामुळे सकाळच्या वेळेत मुंबईत जाणाऱ्या बहुतांशी प्रवाशांची या अतिजलद लोकलना पसंती असते.
यापूर्वी या लोकलनेच अनेक वर्ष प्रवासी प्रवास करत होते. या लोकल यापूर्वी मुंब्रा, कळव्या नजिकच्या पारसिक बोगद्यातून विना वळणाच्या सरळ रेल्वे मार्गिकेतून धावत होत्या. त्यामुळे या लोकलना कितीही गर्दी असली. प्रवासी टिटवाळा, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली भागातून दरवाजाजवळ लटकून प्रवास करत असला तरी तो लोकलमधील दरवाजाच्या आधार दांड्याला धरून एकमेकाला आधार देत मुंबई्च्या दिशेने प्रवास करत होता. परंतु, अतिजलद लोकलसाठी पारसिक बोगद्यातील मार्ग बंद झाला. त्यानंतर अतिजलद लोकल जुना मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ उभारण्यात आलेल्या चार क्रमांकाच्या रेल्वे मार्गिकेतून मुंबई दिशेने धाऊ लागल्या.
या नवीन रेल्वे मार्गिकेसाठी वाकदार वळणे आहेत. मुंब्रा रेल्वे स्थानक येण्यापूर्वी आणि त्यानंतर खाडी मार्गावरून अतिजलद लोकल वेगाने धावत असताना लोकल दोन्ही बाजुला हेलकावे खाते. लोकल दोन्ही बाजुला डचमळत असताना लोकलच्या डब्यातील प्रवाशांचा भार दरवाजात उभ्या असलेल्या प्रवाशांवर येतो. बाहेरच्या प्रवाशाची आतील प्रवाशांना रेटून धरण्याची क्षमता संपली की दरवाजातील प्रवासी एकमेकांना पकडून आपला तोल सांभाळण्याचा प्रयत्न करतात. लोकल दरवाजातील एका प्रवाशाचा तोल सांभाळण्याची क्षमता संपली की तो इतर प्रवाशांना बाहेर ओढून रेल्वे मार्गात हे प्रवासी रांगेत पडतात. काही वेळेला एकच प्रवासी दरवाजात आपला तोल सांभाळून प्रवास करतो. पण त्याची हाताने तोल सांभाळण्याची क्षमता संपली की तो प्रवासी रेल्वे मार्गात पडतो, असे मागील ३० वर्षापासून अतिलजलद लोकलने प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांनी सांगितले.
मुंब्रा रेल्वे स्थानक भागात अतिजलद लोकलची नवीन रेल्वे मार्गिका अतिशय वाकदार आहे. या वळण मार्गावर लोकल रूळावरून लवचिकतेने वेगाने धावते. या खालीवर वेगाने धावणाऱ्या रेल्वे मार्गाने मुळे हेलपाटले जाऊन रेल्वे मार्गात पडतात, असे जाणकार रेल्वे प्रवाशांनी सांगितले.