ठाणे – मध्य रेल्वेच्या मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ मुंबईकडे जाणाऱ्या लोकल गाडीतून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली असून या अपघातानंतर कर्जत, कसारा भागातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या समस्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. यामध्ये रेल्वे प्रमाणेच इतरही वाहतुकीची व्यवस्था असावी, रखडलेले प्रकल्प वेळेत पुर्ण करावे, अर्धा तासाच्या अंतराने लोकल फेऱ्या असाव्यात, ठाणे – कर्जत, कसारा शटल सेवा सुरू करा, अशा विविध मागण्या रेल्वे प्रवासी संघटनांकडून करण्यात आल्या आहेत.
मागील काही वर्षांपासून कसारा कर्जत भागात लोकसंख्या वाढली आहे. येथून दररोज नोकरदार वर्ग मुंबई दिशेकडे प्रवास करतात. या ठिकाणी जाण्यासाठी एक ते दीड तासाच्या अंतराने लोकल गाड्या धावतात. त्यामुळे या लोकल गाड्यांमध्ये कायमच प्रवाशांची गर्दी असते. अनेकजण लोकलच्या दरवाजात लटकत प्रवास करतात आणि अपघाताचे बळी ठरतात. या दररोजच्या समस्यांवर प्रवासी संघटनांकडून वारंवार उपाययोजनांची मागणी केली जात असते. अशातच सोमवारी झालेल्या अपघातामुळे प्रवाशी संघटनांच्या मागण्या जोर धरू लागल्या आहेत.
प्रतिक्रिया
रेल्वे विभाग आधुनिक तंत्रज्ञानाबाबत बडेजावपणा करीत असून त्याचे सत्य उघडकीस आणणारा हा अपघात आहे. रेल्वे रुळामधील तांत्रिक दोष आणि गाड्यांचा जास्त वेग हीच अपघातामागची महत्वाची कारणे असू शकतात. त्यामुळे किमान गर्दीच्या वेळी सकाळी अप दिशेला आणि सायंकाळी डाऊन दिशेला ठाणे स्थानकातून लोकल गाड्यांच्या फेऱ्या वाढविण्याची गरज आहे, हे या अपघातामुळे अधोरेखित झाले आहे.
मनोहर शेलार, सदस्य, सल्लागार, उपनगरीय रेल्वे प्रवासी सल्लागार समिती, मध्य रेल्वे
रेल्वे गाड्या वाढविण्याची मागणी आजची नसून ती मागील १० – १२ वर्षापासून केली जात आहे. पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम झाल्यावर रेल्वे गाड्यांची संख्या वाढेल असे सांगण्यात आले होते. कसारा- कर्जत मार्गावर तिसऱ्या चौथ्या मार्गिकेचे काम ढिसाळ पद्धतीने सुरू आहे. ते पुर्ण झाले तर रेल्वे गाड्यांची संख्या वाढणार आहे. आज राजकीय नेत्याना वाटले तर अटल सेतू, समृद्धी महामार्ग पुर्ण होतो. मात्र ठाण्याच्या पुढील रेल्वे प्रकल्प १२ वर्षाहुन अधिक काळ रखडतात. त्याच्यामुळे पुढील नियोजन डळमळीत होत जाते. वाढलेल्या गर्दीला उपाय म्हणुन प्रकल्प पुर्ण होईपर्यंत कार्यालयीन वेळेमध्ये बदल करणे गरजेचे आहे. पश्चिम मार्गावर रेल्वेचे, मेट्रो आणि रस्त्यांचे विविध प्रकल्प सुरू आहेत. तसेच ठाणे पुढील प्रवाशांसाठी सार्वजनिक वाहतुकीचे व्यवस्था का केली जात नाही ? येथील प्रवाशांनी फक्त रेल्वेवर का अवलंबुन राहावे ? होत असलेले अपघात हे रेल्वे गाड्यांची संख्या वाढवल्याने कमी होणार नाही तर त्यासाठी इतरही उपाययोजना तितक्याच गरजेचे आहेत.
लता अरगडे, अध्यक्षा उपनगरीय रेल्वे महिला प्रवासी महासंघ
कसारा आणि कर्जत साठी एक ते दीड तासाने रेल्वे गाडी आहे. मध्य रेल्वेची ही दोन्ही टोक ग्रामीण भागात येतात. शहरातील प्रवाशांची सोय व्हावी हा हेतू डोळ्यासमोर ठेवत प्रशासन बदलापूर, टिटवाळा, अंबरनाथपर्यंत लोकल वाहतूक १० मिनीटांच्या अंतराने वाढवली जाते. कर्जत कसारा भागातील प्रवासी संघटना १० वर्षांपासून रेल्वे मंत्री, महाव्यवस्थापक अनेकदा भेटून रेल्वे गाड्यांची सेवा जास्त द्या अशी मागणी करत आहोत. तिसरी -चौथी मार्गिका पुर्ण होईल त्यावेळी लोकल सेवा दिली जाईल. मात्र, त्याच मार्गिकेवर दीडशे ते दोनशे मेल एक्सप्रेस वाढवल्या आहेत. सातत्याने मागणी करूनही मागण्या पुर्ण होत नाही. ठाणे ते कर्जत आणि ठाणे ते कसारा या मार्गावर ३२ लोकल फेऱ्या देण्यात येणार होत्या. त्यापैकी केवळ दोन मिळाल्या. त्याचा पाठपुरावा करत होतो पण अद्याप त्या मिळालेल्या नाहीत.
राजेश घणघाव, अध्यक्ष कल्याण कर्जत -कसारा रेल्वे प्रवासी संघटना
कर्जत, कसारा या ग्रामीण भागात चार ते पाचवर्षात प्रवाशांमध्ये दुप्पटीने वाढ झाली. मात्र लोकल गाड्यांची संख्या वाढली नाही. लांब पल्ल्याच्या गाड्यांना दिवा स्थानकात थांबा देण्यात आला आहे. तो काढण्यात आला पाहिजे. ठाण्यावरून कर्जत-कसारा शटल सेवा अर्धा तासाने सुरू करा. कसारा कर्जत भागात जाण्यासाठी देखील मेट्रो प्रकल्प राबवला पाहिजे.
जितेंद्र विशे, सल्लागार, कल्याण कर्जत -कसारा रेल्वे प्रवासी संघटना
गेल्या अनेक वर्षापासून दिव्याहुन मुंबईकडे जाण्यासाठी सकाळी गर्दीच्यावेळी दोन लोकल गाड्या सुरू करण्याची मागणी आहे. कल्याण, अंबरनाथवरून येणाऱ्या लोकल गाड्यांऐवजी कर्जत कसारा मार्गावरून येणाऱ्या लोकल गाड्यांना थांबा दिला जातो. त्यामुळे अपघाताची परिस्थीती उद्भवली. रोज अशा घटना होत असतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने जागे झाले पाहिजे आणि हे प्रश्न सोडवले पाहिजेत.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.विजय भोईर, अध्यक्ष कोकण रेल्वे प्रवासी संघटना