ठाणे – यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यांना मदत करण्यासाठी म्हणून महाराष्ट्र शासनासह विविध संस्था, व्यक्ती पुढे सरसावले आहेत.

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयही या मदतकार्यात पुढे सरसावले असून त्यांनी यासाठी एक क्यू आर कोड तयार केला आहे. या क्यूआर कोड द्वारे जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी स्वेच्छाने पुरग्रस्तांसाठी निधी देत आहेत.

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) रुपाली भालके, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) सर्जेराव मस्के-पाटील, उपजिल्हाधिकारी (रोहयो) शशिकांत गायकवाड, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) वैशाली माने, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख नितीन पाटील, प्रांताधिकारी उर्मिला पाटील, तहसिलदार रेवण लेंभे, सचिन चौधर, संदीप थोरात, अमोल कदम, प्रदिप कुडाळ, उज्वला भगत, निलेश गौड, मुकेश पाटील, जिल्हा खनिकर्म अधिकारी विवेक घुले यांच्या पुढाकारातून जिल्हाधिकारी कार्यालय आणि सर्व प्रांत व तहसिल कार्यालय यांनी दिवाळी फराळ कार्यक्रमासोबतच “एक हात पूरग्रस्तांच्या मदतीकरिता” याअंतर्गत “माणुसकीची दिवाळी” हा उपक्रम राबविला.

यावेळी अनेक अधिकारी-कर्मचार्‍यांनी ‘मुख्यमंत्री सहायता निधी’ कक्षाच्या बँक खात्यावर क्यू आर कोडच्या माध्यमातून स्वेच्छा निधी थेट जमा केला. पहिल्याच दिवशी हा निधी जवळपास एक लाख रूपयांच्या आसपास पोहोचला. शासन आणि प्रशासन हे नेहमीच नागरिकांच्या कल्याणाकरिता अहोरात्र प्रयत्न करीत असते, त्यासाठी हे देखील कर्तव्य आणि माणुसकीच्या भावनेतून केलेले एक छोटेसे योगदान असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी म्हटले.