करोनाच्या अनपेक्षित संकटाचा जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. आर्थिक समस्यांबरोबरच बेरोजगारांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. भारतामध्येही चित्र फारसं वेगळं नाहीय. भारतामध्येही वेगवेगळ्या क्षेत्रांमधील लाखो लोकं बेरोजगार झालेत. एकीकडे असं चित्र असतानाच दुसरीकडे सोशल मीडियावर एक मेसेज सध्या व्हायरल होताना दिसत आहे. या मेसेजमध्ये सरकार यावर्षी नवरात्रीमध्ये बेरोजगारांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध करुन देणार असल्याचा दावा केला जात आहे. व्हॉट्सअपवर तर हा मेसेज प्रचंड व्हायरल झाला आहे. करोना लॉकडाउनच्या कालावधीमध्ये देशभरामध्ये अनेकदा खोट्या बातम्या आणि अफवा सोशल मीडियावरुन व्हायरल होताना दिसतात. मात्र सरकारच्या पत्रसूचना विभागालाच (पीआयबी) सरकारने नवरात्रीच्या कालावधीमध्ये असा कोणताही निर्णय घेतला नसल्याचा खुलासा ट्विटरवरुन केला आहे.

व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की देशभरातील वाढती बेरोजगारी लक्षात घेता केंद्र सरकार या नवरात्रीमध्ये देशातील नागरिकांना घर बसल्या रोजगार कमवण्याची संधी देणार आहे. या योजनेअंतर्गत रोज घर बसल्या एक ते दोन हजार रुपये कमवता येणार आहे. यासाठी तुम्हाला दिलेल्या लिंकवर नाव नोंदणी करावी लागेल असा दावा केला जात आहे. मात्र भारत सरकारच्या पीआयबी फॅक्टचेक च्या अकाऊंटवरुन हा दावा खोटा असल्याचे सांगण्यात आलं आहे. व्हायरल मेसेजमध्ये केल्या जाणाऱ्या दाव्याप्रमाणे केंद्र सरकारकडून महिला स्वरोजगारसारखी कोणतीही योजना चालवली जात नसल्याचे पीआयबीने म्हटलं आहे.

करोनाच्या कालावधीमध्ये अनेक खोट्या बातम्या व्हायरल होताना दिसत आहेत. भारत सरकारच्या पत्रसूचना विभागाने मागील अनेक आठवड्यांपासून या व्हायरल बातम्यांसंदर्भातील खुलासे वेळोवेळी केले आहेत. अशा खोट्या अफवा डिजीटल माध्यमातून पसरु नयेत म्हणून सरकारी यंत्रणा प्रयत्न करत आहेत. मात्र या अफवांची संख्या कमी होताना दिसत नाहीय.

तुम्हाला असा खोटा मेसेज आल्यास…

तुम्हालाही अशाप्रकारचा एखादा सरकारी योजनेचा मेसेज आल्यास पीआयबीच्या फॅक्ट चेक साईटवर म्हणजेच https://factcheck.pib.gov.in/ वर तुम्ही त्याची सत्यता पडताळून पाहू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही व्हॉट्सअपवरुन +91 8799 7112 59 या क्रमांकावर अथवा pibfactcheck@gmail.com या ईमेल आयडी वरुन माहितीची सत्यता पडताळून घेऊ शकता. ही माहिती  https://pib.gov.in वरही उपलब्ध आहे.