वसई : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील विरार पूर्वेच्या खानिवडे टोल नाका परिसरात बुधवारी बाराच्या सुमारास वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून प्रवाशांचे व वाहनचालकांचे चांगलेच हाल झाले.

वसई पूर्वेच्या भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. हा महामार्ग मुंबई, ठाणे, वसई विरार, मीरा भाईंदर, पालघर, गुजरात यासह इतर भागांना जोडणारा प्रमुख महामार्ग आहे. मागील काही वर्षांपासून या महामार्गावर पाणी साचणे, खड्डे पडणे, वाहतूक कोंडी, अपघाताच्या घटना अशा विविध समस्या निर्माण होत आहेत.

बुधवारी गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या वाहिनीवर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. खानिवडे सकवार भागात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. जड अवजड वाहने ही मोठ्या प्रमाणात असल्याने वाहनांच्या रांगा आठ ते दहा किलोमीटर पर्यंत लांब गेल्या होत्या. त्यामुळे कामासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना दोन ते तीन तास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागले असल्याचे प्रवाशांनी सांगितले आहे.

प्राधिकरणाकडून काम हाती घेताना त्याचे नियोजन नसते त्याचा फटका हा प्रवाशांना बसत आहे. याशिवाय गुजरात वाहिनीवर विविध ठिकाणी पडलेले खड्डे व अपूर्ण अवस्थेत असलेले काम यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. ही वाहतूक कोंडी पालघरच्या सातीवली पासून सुरू होऊन ती विरारच्या हद्दी पर्यंत येऊन पोहचली आहे. वाहतूक नियंत्रणासाठी त्या ठिकाणी कर्मचारी नियुक्त केले आहेत असे चिंचोटी महामार्ग पोलिसांनी सांगितले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विरुद्ध दिशेने वाहने काढण्याचा प्रयत्न

गुजरात वाहिनीवर वाहतूक कोंडी झाल्याने अनेक वाहन चालकांनी विरुद्ध दिशेने वाहने काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळ मुंबई दिशेने जाणाऱ्या वाहिनीवर अडचण निर्माण झाल्या होत्या. तसेच काही वाहन चालक हे मध्येच वाहने टाकत असल्याने अपघाताचा धोका ही वाढला होता.