वसई : नागरिकांच्या वाढत्या तक्रारीनंतर महामार्ग प्राधिकरणाने मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर टाकण्यात आलेला राडारोडा उचलण्यास सुरवात केली आहे. आतापर्यंत वसई विरार भागातून ७० ते ७५ डंपर इतका राडारोडा उचलण्यात आला आहे. वसई पूर्वेच्या भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. मुंबई गुजरातसह इतर शहरांना जोडणारा हा महत्वाचा मार्ग आहे. आधीच हा महामार्ग विविध समस्यांनी ग्रासला आहे. त्यातच मागील दोन ते तीन वर्षांपासून महामार्गावर राडारोडा आणून टाकण्याचे प्रकार सुरू झाले आहेत.  विशेषतः मुंबई यासह अन्य ठिकाणी इमारतींचा पुनर्विकास व अन्य विकास कामे  झपाट्याने सुरू आहेत. 

त्यामुळे खोदकाम, जुनी बांधकामे तोडणे त्यामुळे मोठ्या प्रमाणात राडारोडा बाहेर निघत आहे. या राडारोड्याची विल्हेवाट लावण्याऐवजी थेट मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वसई विरार शहराच्या हद्दीत आणून टाकला जात आहे. रात्रीच्या सुमारास छुप्या मार्गाने मुंबई व अन्य भागातील राडारोड्याने भरलेली वाहने महामार्गालगत खाली केली जात आहेत. वर्सोवा पुलापासून ससूनवघर, मालजीपाडा, चिंचोटी, नायगाव, सातीवली फाटा, पेल्हार, विरार अशा विविध ठिकाणी हा राडा रोडा टाकून दिला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. या वाढत्या राडारोड्यामुळे महामार्गाचे विद्रुपीकरण होत आहे. तर दुसरीकडे पाणी ये जा करण्याचे नैसर्गिक मार्गही बंद होत आहेत. या राडारोड्याच्या संदर्भात नागरिकांमधून मोठ्या प्रमाणात तक्रारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे येत होत्या. अखेर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वसई विरार भागात महामार्गालगत टाकण्यात आलेला राडारोडा उचलण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत ७० ते ७५ डंपर इतका राडारोडा उचलून नेला असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे व्यवस्थापक सुहास चिटणीस यांनी सांगितले आहे.

राडाराडा रोखण्यासाठीची चेक पोस्ट बंद

मुंबईतून राडारोड्याने भरलेली वाहने वसई विरारच्या भागात आणून टाकली जात आहेत. हा प्रकार रोखण्यासाठी महामार्ग प्राधिकरणातर्फे वर्सोवा पुलाजवळील घोडबंदर येथे चेक पोस्ट तयार केली आहे.  पोलीस, महापालिका व महामार्ग कर्मचारी यांच्या मार्फत त्यावर पाळत ठेवून राडारोड्याने भरलेल्या गाड्या पुन्हा माघारी पाठविल्या जातील अशी योजना आखली होती. मात्र वेशीवर असलेली चेक पोस्ट बंद आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महामार्गावर टाकण्यात आलेला राडारोडा उचलण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ज्या ज्या भागात राडा रोडा आहे तो उचलून महामार्गाचा परिसर मोकळा केला जाणार आहे. – सुहास चिटणीस, प्रकल्प व्यवस्थापक महामार्ग प्राधिकरण