मुंबईत कुठल्याही प्रकारे अतिरेकी हल्ला होऊ शकतो अशा गुप्तचर विभागाच्या सूचना यापूर्वीच आल्या आहेत. गर्दीची ठिकाणे आणि संध्याकाळची वेळ हे अतिरेक्यांचे टार्गेट आहे. पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मॉल्स अतिरेक्यांच्या टार्गेटवर असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच मुंबई पोलीस आयुक्तांनी मॉल्सना सुरक्षाव्यवस्था कशी कडक करायची, त्याचे सात पानी सूचनांचे पत्र पाठविले आहे. चकाचक दिसणाऱ्या मॉल्सची सुरक्षाव्यवस्था तकलादू आणि पोकळ असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे.
दिवसेंदिवस मुंबईच्या विविध भागात चकचकीत मॉल्स उभे राहत आहेत. बहुराष्ट्रीय कंपन्यांनी या मॉल्सच्या व्यवसायात उडी घेतली आहे. हे चकचकीत मॉम्ल्स मुंबईकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनू लागले असल्याने त्यात दिवसेंदिवस मोठी गर्दी वाढत असते. पण या मॉल्सची सुरक्षाव्यवस्था कमकुवत असल्याचे पोलिसांच्या सव्‍‌र्हेक्षणात दिसून आले आहे. एकीकडे मुंबई पोलीस मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी काटेकोर उपाय योजत असताना या मॉल्समध्ये मात्र कमकुवत सुरक्षाव्यवस्था आढळून येत आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी सात पानी पत्र सर्व मॉल्सना पाठवून सुरक्षा व्यवस्था अधिक मजबून करण्याचे निर्देश दिले आहेत. ही सुरक्षाव्यवस्था कशी असावी त्याची मार्गदर्शक सूचनाही या पत्रात करण्यात आली आहे.
मॉल्स असुरक्षित
काही महिन्यांपूर्वी बांगूरनगर पोलिसांनी मॉल्सच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी स्टिंग ऑपरेशन केले होते. त्यावेळी मॉल्सच्या सुरक्षेचा पोकळपणा उघडकीस आला होता. एका प्रख्यात मॉलमध्ये साध्या वेषातील पोलीस शस्त्र घेऊन शिरले. मेटल डिटेक्टरमध्ये शस्त्र असल्याचे दाखविण्यात आले नाही. शस्त्र घेऊन पोलीस तासभर मॉल्समधील विविध दुकानात फिरले. त्यानंतर गणवेषातील पोलिसांनी आत जाऊन साध्या वेषातील पोलिसाकडे शस्त्र असल्याचे दाखवले. हे पाहून मॉलचालकांची पुरती धावपळ उडाली. याबाबत बोलताना एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, हे मेटल डिटेक्टर बिनकामाचे होते. जर माथेफिरू किंवा दहशतवादी शिरला असता तर किती मोठा अनर्थ घडू शकला असता त्याची कल्पनाच न केलेली बरी. अनेक मॉल्समधली सुरक्षाव्यवस्था ही केवळ दिखाऊ असते. गर्दीच्या वेळी नियंत्रण ठेवण्याची व्यवस्था त्यांच्याकडे नाही. त्यांच्याकडून आत जाणाऱ्या लोकांची तपासणी केवळ नावालाच असते. अनेक मॉल्ममध्ये सर्व भागात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. मॉल्स हे सर्वाधिक गर्दीचे ठिकाण आहे. तेथील सुरक्षाव्यवस्था कडक नसेल तर दहशतवादी त्याचा फायदा उठवू शकतील अशी भीती पोलिसांना वाटतेय. अधिकाअधिक प्रशिक्षित सुरक्षारक्षकांची नेमणूक करणे, अत्याधुनिक सुरक्षेची यंत्रसामुग्री वापरणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसवून त्यावर सतत देखरेख ठेवणे आदी सूचनांचा यात समावेश आहे.

जी अवस्था मॉल्सची आहे तीच मोठय़ा रुग्णालयांचीसुद्धा. त्यामुळेच रुग्णालयांनाही सुरक्षेच्या नियमांबाबत हे पत्र पाठविण्यात आले आहे. आजवर पंचतारांकित हॉटेल्स हे सुरक्षित मानले जात होते. २६ नोव्हेंबरच्या हल्ल्यानंतर ते चित्र बदलले. यानंतर सर्वच पंचतारांकित हॉटेल्सनी आपली सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. ताज हॉटेलने आपली सर्व प्रवेशद्वारे बंद करून एकच मुख्य प्रवेशद्वार ठेवला आहे. सुदैवाने मॉल्समध्ये अजून अशी घटना घडलेली नसली तरी सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचे पोलिसांनी सांगितले.