गौण खनिज वाहतूक प्रकरणात पंचनामा रद्द करण्यासाठी तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना तालुक्यातील गलवाडे येथील ग्रामसेवकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.
तक्रारदाराचा शहर परिसरात गौण खनिज वाहतुकीचा व्यवसाय आहे. तहसीलदार प्रमोद किसन हिले यांनी तक्रारदारास ट्रॅक्टरने गौण खनिज वाहतूक केल्यामुळे तीन पंचनामे करण्यात आल्याचे सांगितले. पंचनाम्यांचा दंड भरावयाचा नसल्यास गलवाडे येथील ग्रामसेवक चेतनकुमार शिवाजी पाटील यांना भेटून २० हजार रुपये देण्यास सुचविले.
पैसे दिल्यानंतर पंचनामे रद्द करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिल्याने तक्रारदाराने ३० डिसेंबर रोजी पाटीलची भेट घेतली. पाटीलने आपणास तहसीलदारांचा फोन आला असून तुम्ही २० हजार रुपये द्या, तुमचे पंचनामे रद्द करावयास सांगतो असे नमूद केले. दरम्यान, तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली.
तहसीलदारांना भ्रमणध्वनीवरून प्रशांतचे काय करायचे, असा संदेश पाठविला. त्यावर तहसीलदाराने पाटीलच्या भ्रमणध्वनीवर संपर्क करून तक्रारदाराकडून २० हजार रुपये घेण्यास सांगितले. त्यानुसार पाटील तक्रारदाराकडून तहसील कार्यालयासमोरील एका हॉटेलमध्ये २० हजार रुपये स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यास अटक केली.