विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले असले तरी मृत्यूनंतरच विषाचा प्रकार व त्याची तीव्रतेची तपासणी केली जाते, परंतु हीच तपासणी वेळेवर झाली तर त्या व्यक्तीवर योग्य उपचार केला जाऊन अनेकांना जीवनदानही मिळू शकते. त्यामुळे प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र विष नियंत्रण केंद्र उभारण्याची गरज व्यक्त केली जात आहे. सध्या अशा रुग्णांवर पारंपरिक पध्दतीनेच उपचार केले जात आहेत.
अनेक प्रकारांनी आत्महत्या केल्या जात असल्या तरी कीटकनाशक प्राशन करून त्या करण्याचे प्रमाण बरेच वाढले आहे. सध्या बाजारात नवनवीन व अत्यंत घातक कीटकनाशके उपलब्ध आहे. काहींमध्ये विषाची तीव्रता कमी, तर काहींमध्ये जास्त असते. हे विष टप्प्याटप्प्याने परिणाम करून रुग्णाचा जीव घेते. अशा रुग्णाच्या शरीरावरील लक्षणांवरून आणि त्याने नेमके कोणते औषध किती प्रमाणात घेतले, याचा अंदाज वर्तवून डॉक्टर उपचार करतात. अनेकदा डॉक्टरांना विषाची तीव्रताच लक्षात येत नाही. त्यामुळे योग्य औषधोपचाराअभावी रुग्ण दगावण्याचा धोका असतो. बऱ्याचदा उपचार करण्यास डॉक्टरांनाही अपयश येत आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र विष नियंत्रण केंद्र असण्याची गरज व्यक्त केली जात आहे. विदर्भात विषारी औषध प्राशन करून मृत्यू झालेल्या व्यक्तीचे शवविच्छेदन केल्यानंतर विषाचे नमुने नागपुरातील प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जाते. प्राप्त अहवालातून मृत्यूचे नेमके कारण, विषाची तीव्रता आणि त्यात असलेले घटकही आदी अहवालातून स्पष्ट होतात, पण हेच निदान जिवंतपणी झाल्यास विषारी औषधाच्या तीव्रतेनुसार रुग्णावर उपचार होऊन रुग्णाचे प्राण वाचू शकतात. नागपुरातील प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत २०१० मध्ये २५१८, २०११ मध्ये २९४२, २०१२ मध्ये ३२४१ आणि २०१३ मध्ये ३०२१ विषाचे नमुने तपासणीसाठी आले. या आकडेवारीवरून विदर्भात विष प्राशन करून आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाणही स्पष्ट होते.
रुग्ण वाचावा हाच प्रयत्न
विषबाधा झालेला रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात आल्यावर लक्षणांवरूनच उपचार सुरू करावा लागतो. यासंदर्भात डॉक्टरांचे कौशल्य कामी येते. शासकीय रुग्णालयांमध्ये व जिल्हा रुग्णालयांमध्ये याबाबतच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध नाहीत. असे असले तरी तेथील डॉक्टर्स शर्थीचे प्रयत्न करून रुग्णाला वाचवण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र विष नियंत्रण केंद्र निर्माण करणे हे सरकारचे काम आहे. शासकीय रुग्णालयात जी यंत्रसामुग्री उपलब्ध आहे, त्याचाच वापर करून आम्ही रुग्णांवर उपचार करतो. एखादी नवीन यंत्रणा निर्माण करणे हे शासनाचे काम आहे.
डॉ. योगेश नावाडे, जिल्हा शल्य चिकित्सक