उद्या युद्धाचा प्रसंग उदभवल्यास सलग दहा दिवसांपेक्षा जास्त युद्ध लढता यावे, त्यादृष्टीने भारतीय लष्कराने दारुगोळयाचा साठा करण्यास सुरुवात केली आहे. हळूहळू पद्धतशीरपणे भारतीय लष्कराकडून युद्धसामग्रीचा साठा वाढवण्यात येत आहे. यामध्ये रॉकेट, मिसाइल, रणगाडयांपासून तोफगोळयांचा समावेश आहे.

सलग ४० दिवस युद्ध लढता येईल, इतका युद्धसाहित्याचासाठा करण्याचे लक्ष्य आहे. लष्करासाठी वेगवेगळया शस्त्रास्त्रांचा १० (I) लेव्हलपर्यंत स्टॉक करण्यात येणार असल्याचे संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले. १० (I) म्हणजे उद्या युद्धाला तोंड फुटल्यास सलग १० दिवस घनघोर युद्ध लढण्याइतपत शस्त्रास्त्र उपलब्ध असतील. २०२२-२३ पर्यंत भारतीय लष्कराकडे इतका साठा जमा होईल.

भारतीय लष्कर युद्धसाहित्याचा साठा करणार आहे, याचा अर्थ आता लष्कर युद्धासाठी तयार नाही असा होत नाही. चीन आणि पाकिस्तानकडून असलेला धोका लक्षात घेता, राखीव दारुगोळा मोठया प्रमाणात उपलब्ध असणे आवश्यक आहे असे सूत्रांनी सांगितले. आधी दारुगोळयाची मोठया प्रमाणात कमतरता होती. ती आता बऱ्यापैकी भरुन काढण्यात आली आहे.

लष्करासाठी १२,८९० कोटींच्या २४ करारांवर स्वाक्षऱ्या होणे अजून बाकी आहे. १० दिवसांचे टार्गेट पूर्ण झाल्यानंतर ४० दिवसांचा युद्धसाहित्याचा साठा जमवण्याचे लक्ष्य आहे. खूप मोठया प्रमाणातही युद्धसाहित्याचा साठा करुन ठेवणे आर्थिकदृष्टया व्यवहार्य नाही.