योगगुरु रामदेव यांनी अ‍ॅलोपॅथी आणि डॉक्टरांवर केलेल्या वक्तव्यामुळे वाद वाढत चालला आहे. योगगुरु रामदेव यांच्या वक्तव्याविरोधात आयएमएनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. एका व्हायरल व्हिडिओचा संदर्भ देत आयएमएनं योगगुरु रामदेव यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी योगगुरु रामदेव यांना पत्र लिहून वक्तव्य मागे घेण्यास सांगितलं आहे. करोना काळात डॉक्टरांबाबत असं विधान करणं दुर्देवी असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

“अ‍ॅलोपॅथी औषधं आणि डॉक्टरांवर टीका करणं दुर्दैवी आहे. आपल्या वक्तव्यामुळे देशवासीय खूप दु:खी झाले आहेत. करोनाविरोधात दिवसरात्र काम करणारे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी देवदूत आहेत. अशा वेळेत आपण करोना योद्ध्यांचा अपमान केल्यानं खूप दु:ख झालं आहे. आपण जे स्पष्टीकरण दिलं आहे त्याने वेदना शमणार नाहीत” असं आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे.

“लाखो करोना रुग्णांचा मृत्यू अ‍ॅलोपॅथी औषधं घेतल्याने झाल्याचं आपलं वक्तव्य चुकीचं आहे. आपल्याला करोनाविरुद्धची लढाई एकत्रितपणे लढायची आहे. हे आपल्याला विसरून चालणार नाही. डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचारी जीव धोक्यात टाकून रुग्णांची सेवा करत आहेत. ते दिवसरात्र एक करून रुग्णांची सेवा करत आहेत”, असंही त्यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे. “आशा आहे की आपण या विषयावर गंभीरतेने विचार कराल आणि करोना योद्धांचा सन्मान कराल. तसेच वादग्रस्त वक्तव्य पूर्णपणे मागे घ्याल” असंही त्यांनी पुढे म्हंटलं आहे.

मोदींनी नेमका त्याच दिवशी मास्क का नव्हता घातला? – नवाब मलिकांचा खोचक प्रश्न

योगगुरु रामदेव यांनी करोना मृत्यूमागे अ‍ॅलोपॅथी कारण असल्याचं सार्वजनिकरित्या सांगितलं आहे. करोना रुग्णांवर अ‍ॅलोपॅथी औषधांचा मारा केल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे करोनाकाळात रुग्णांची सेवा करण्याऱ्या डॉक्टरांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आयएमएने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर पंतजली योगपीठने योगगुरु रामदेव यांचं तशी भावना नसल्याचं सांगितलं आहे.