सध्या सगळा देश करोना नावच्या महाभयंकर संकटाशी सामना करतो आहे. ही वेळ कोणत्याही राजकारणाची नाही तर एकमेकांना साथ देण्याची आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. तसंच काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनीही या आशयाचं ट्विट केलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात पाच प्रमुख मुद्द्यांचा उल्लेख आहे. काय आहेत हे पाच मुद्दे? १)सरकारद्वारे टेलिव्हिजन, प्रिंट आणि ऑनलाइन मीडियाला दिल्या जाणाऱ्या सगळ्या जाहिराती थांबवण्यात याव्यात. दोन वर्षांसाठी हा निर्णय घेतला तर १२५० कोटींची बचत दरवर्षी होईल. हा निधी करोनासाठी लढण्यास उपयुक्त ठरु शकतो. २) सरकारी इमारतींच्या बांधकामांसाठी जे २० हजार कोटी मंजूर करण्यात आले आहेत ती मंजुरी मागे घ्यावी. संसदेच्या सध्याच्या इमारतीत चांगले काम होते आहे. सरकारने हा निधी रुग्णालय सुधारणा, पीपीई यांसाठी खर्च करावा ३) खासदारांचं वेतन, पेन्शनमध्ये जी ३० टक्के कपात करण्यात आली आहे तो निधी कामगार वर्ग, शेतकरी आणि छोट्या व्यावसायिकांच्या मदतीसाठी देण्यात यावा ४) राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री तसंच अधिकारी यांचे विदेश दौरे थांबवण्यात यावेत. या प्रवासखर्चाची जी बचत होईल ती रक्कम करोनाविरोधी लढाईसाठी वापरण्यात यावी. पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्र्यांचे दौरे थांबवले तरीही ३९३ कोटी रुपये वाचू शकतात असंही सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. ५) PM CARES ला जो काही निधी मदत म्हणून देण्यात आला आहे तो पंतप्रधान मदत निधीमध्ये वर्ग करण्यात यावा. पंतप्रधान मदत निधीमध्ये सध्या ३८०० कोटी रुपये आहेत. अशात दोन फंडांची रक्कम एकत्र केली तर ते योग्यच ठरेल. Congress President and CPP Chairperson Smt. Sonia Gandhi writes to PM Modi suggesting various measures to fight the COVID-19 pandemic. pic.twitter.com/77MzCYiokl — Congress (@INCIndia) April 7, 2020 तर हे पाच प्रमुख मुद्दे उपस्थित करत सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. देशभरात करोनाचे ४ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आहेत. देश एका मोठ्या महामारीचा सामना करतो आहे. अशात सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून करोनाशी लढण्यासाठी आपण निधी कसा वाचवू शकतो याची पाच उदाहरणं दिली आहेत. आता सोनिया गांधींनी केलेल्या या मागण्या मान्य होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.