देशातील करोनाबाधित रुग्णांची संख्या अजूनही मंदावलेली नाही. दररोज ८० ते ९० हजारांच्या दरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या काही आठवड्यापासून अचानक झालेल्या रुग्णवाढीनं देशातील एकूण रुग्णांची संख्याही प्रचंड वाढली असून, ५७ लाखांच्या पुढे गेली आहे. दुसरेकडे करोना मृतांची संख्या लाखाच्या जवळ गेली आहे. गेल्या २४ तासात देशात १,१२९ जणांचा संसर्ग होऊन मृत्यू झाला.

आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात ८६ हजार ५०८ नवीन करोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे देशातील करोना बाधितांची संख्या ५७ लाख ३२ हजार ५१९ इतकी झाली असून, २४ तासांत १,१२९ जण मृत्युमुखी पडल्यामुळे मृतांची एकूण संख्या ९१ हजार १४९ झाली आहे. करोनामुळे झालेल्या मृत्यूंचा दर १.५९ टक्क्य़ांपर्यंत कमी झाला आहे..

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात ९ लाख ६६ हजार ३८२ जणांवर उपचार सुरु आहेत. तर करोना संसर्गातून बरे झालेल्यांची संख्या ४६ लाख ७४ हजार ९८८ इतकी झाली आहे. दरम्यान, आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार देशात आतापर्यंत ६ कोटी ७४ लाख ३६ हजार ३१ करोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. तर बुधवारी ११ लाख ५६ हजार ५६९ करोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.