कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी मंगळवारी उत्तर प्रदेशमधील झाशी जिल्ह्यामधील इलाइट चौकामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते जमा झाले होते. मात्र आंदोलनाला सुरुवात करण्याआधीच या चौकात लावण्यात आलेल्या माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या पुतळ्याची कोणीतरी विटंबना केल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं. देशाच्या माजी पंतप्रधानांच्या पुतळ्याची तोडफोड झाल्याचे पाहून काँग्रेस कार्यकर्ते चांगलेच संतापले. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी याच पुतळ्याला फुलांचे हार घालून पुतळ्यासमोर बसून धरणे आंदोलन सुरु केले.

काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रदीप आदित्य जैन यांनी काही समाजकंटकांनी माजी पंतप्रधानांच्या पुतळ्याची तोडफोड केल्याचा आरोप केला. या प्रकरणामध्ये दोषींविरोधात गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी जैन यांनी केली. तसेच सध्याचा पुतळा हटवून याच ठिकाणी नवा पुतळा बसवण्यात यावा अशी मागणीही जैन यांनी केली. त्याचप्रमाणे या ठिकाणी जोपर्यंत नेहरुंचा नवा पुतळा बसवला जात नाही तोपर्यंत काँग्रेस कार्यकर्ते धरणे आंदोलन सुरु ठेवतील अशी भूमिका जैन यांनी घेतली.

पोलीस आणि स्थानिक प्रशासनातील अधिकाऱ्यांनी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांना आश्वासन दिलं आहे की लवकरच या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक केली जाईल. काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप आणि गर्दी पाहून या ठिकाणी अतिरिक्त पोलीस दलाला तैनात करण्यात आलं. कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या आजच्या भारत बंदला ११ राजकीय पक्षांनी समर्थन दिलं आहे.

भारत बंदच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी आढावा बैठक घेतली होती. या वेळी त्यांनी या बंदमुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये सामान्य नागरिकांची गैरसोय होणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. तसेच बंदच्या नावाखाली जबरदस्तीने दुकाने बंद करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेशही योगींनी दिले आहेत.