बिहार विधानसभा निवडणुकीत महाआघाडीलाच लोकांनी कौल दिला होता. मात्र निवडणूक एनडीएच्या बाजूने होता त्यामुळे ते निवडणूक जिंकले असा आरोप आता राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी केला आहे. भाजपाने असं करण्याची ही पहिली वेळ नाही. २०१५ मध्ये महाआघाडी स्थापन झाली त्यावेळीही जनमताचा कौल आमच्याच बाजूने होता मात्र भाजपाने मागच्या दाराने प्रवेश करुन सत्ता मिळवली असंही तेजस्वी यादव यांनी म्हटलं आहे. मी बिहारच्या जनतेचे आभार मानतो असंही तेजस्वी यादव यांनी म्हटलं आहे.

बिहार निवडणुकीचे निकाल परवा जाहीर झाले. या निवडणूक निकालात NDA ला बहुमत मिळालं. NDA ला १२५ तर महाआघाडीला ११० जागा मिळाल्या. मात्र मतमोजणीच्या दरम्यान एनडीए आणि महाआघाडीत चांगलीच चुरस पाहण्यास मिळाली. तेजस्वी यादव यांचा राजद हा ७५ जागा मिळवत बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

निवडणूक निकालाच्या दिवशीही तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार हे मतमोजणी प्रक्रियेत ढवळाढवळ करत आहेत असा आरोप केला होता. महाआघाडीच्या विजयी उमेदवारांना पराभूत घोषित करण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला. आता आज पुन्हा एकदा पत्रकार परिषदेत त्यांनी जनमताचा कौल हा आमच्या बाजूनेच होता मात्र निवडणूक आयोग एनडीएच्या बाजूने होता असा आरोप केला आहे.