एक जून २०२० पासून देशात अनेक मोठे बदल आणि नियम बदलणार आहेत. याचा थेट परिणाम आपल्या आयुष्यावर पडणार आहे. काही नव्या नियमांचा थेट फायदा होणार आहे तर काहींचा फटका सहन करावा लागणार आहे. यातील काही गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास आर्थिक नुकसानही होऊ शकते. रेल्वे, गॅस सिलेंडर, पेट्रोल-डिझेल यांची भाववाड.. तसेच रेशन कार्ड आणि रेल्वेच्या नियमातील बदलांचाही यात समावेश आहे. पाहूयात आजपासून बदलणाऱ्या महत्वाच्या गोष्टी…

एक देश एक रेशन कार्ड’ योजनेला सुरूवात –
करोना महामारीमध्ये स्थलांतरित कामगार, रोजंदारी मजूर आणि प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. एक जून २०२० पासून २० राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात ‘एक देश एक रेशन कार्ड’ योजनेला सुरूवात झाली आहे. या योजनेनुसार पात्र लाभार्थ्यांला राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार देशातील कोणत्याही रास्त भावाच्या दुकानातून त्याच्याकडे असलेल्या रेशन कार्डचा वापर करून अन्नधान्य घेता येणार आहे. या योजनेचा फायदा ६७ कोटी लोकांना फायदा होईल.

आणखी वाचा- आजपासून ‘एक देश एक रेशन कार्ड’ योजनेला सुरूवात; लाखो स्थलांतरित कामगार, मजुरांना होणार फायदा

घरगुती गॅस महागले –
सामान्यांच्या खिशाला झळ बसणारी बातमी आहे. आजपासून १४ आणि १९ किलोंचा एलपीजी गॅस महागला आहे. १४ किलोचा गॅस सिलेंडर मुंबई आणि दिल्लीत ११ रुपये ५० पैशांनी महागला आहे. १९ किलो किंमतीचा गॅस सिलेंडर राजधानी दिल्लीत ११० रुपयांनी तर मुंबईमध्ये १०९ रुपयांनी महागला आहे.

आणखी वाचा- सामान्यांना झळ, गॅस सिलेंडर महागले

रॉकेलच्या किंमतीत कपात –
तेल कंपनीने रॉकेलच्या किंमतीत कपात केली आहे. दिल्ली रॉकेल फ्री राज्य म्हणून घोषित केल्यामुळे तेथील किंमती जाहिर होत नाहीत. कोलकातामध्ये आज रॉकेलच्या किंमतीत १२ रुपये १२ पैशांनी कपात झाली. मुंबईत रॉकेल प्रतिलीटर १३ रुपये ८६ पैसे झाले आहे.

आजपासून २०० रेल्वे धावणार, प्रवासापूर्वी वाचा नियम –
लॉकडाउनच्या पाचव्या टप्याच्या सुरूवातीलाच २०० नव्या रेल्वे गाड्या धावनार आहेत. यापूर्वी १२ मे पासून राजधानी एक्स्प्रेससारख्या ३० रेल्वे धावत होत्या. आता एक जूनपासून एकूण २३० रेल्वे प्रवाशांसाठी उपलब्ध असतील. या सर्व रेल्वे मेल आणि एक्स्परेस आहेत. या रेल्वेंना वेळापत्रकानुसार चालवले जाणार आहे. या सेवेच्या पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी देशभरातून १ लाख ४५ हजार प्रवासी प्रवास करणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

आणखी वाचा- प्रवाशांनो लक्ष द्या….आजपासून २०० रेल्वे धावणार, प्रवासापूर्वी वाचा नियम

विमानप्रवास महागला –
एविएशन टर्बाइन फ्यूल (ATF) च्या किंमतीत वाढ झाल्यामुळे विमान प्रवासही महागला आहे. इंडियन ऑयलच्या संकेतस्थळानुसार, राजधानी दिल्लीत एटीएफचा दर 11030.62 रुपये प्रति किलोलीटरने वाढून 33,575.37 रुपये प्रति किलोलीटर झाला आहे.

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ –
अनेक राज्यात वॅटच्या किंमती वाढवल्यामुळे पेट्रोल आणि डिजेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. मिझोराम सरकारने एक जूनपासून राज्यात पेट्रोलवर २.५ टक्के आणि डिझेलवर ५ टक्के वॅट लावला आहे. त्यामुळे राज्यातील पेट्रोलच्या किंमतीत वाढ झाली. केंद्रशासित प्रदेश जम्मू-कश्मीर आणि महाराष्ट्र यासारख्या राज्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ केली आहे. सोमवारपासून (१ जून) महराष्ट्रात मुंबईपासून ते गडचिरोलीपर्यंत सर्वत्र पेट्रोल व डिझेल महाग होणार असून या दरवाढीमुळे पुढील १० महिन्यांत राज्य सरकारला तीन हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळेल. राज्यात पेट्रोलवर २६ टक्के आणि डिझेलवर २४ टक्के वॅट आहे. तर पेट्रोलवरील अधिभार आता १०.१२ रुपये करण्यात आला आहे. याआधी तो ८.१२ रुपये होता. डिझेलवरील अधिभार १ रुपयांवरून ३ रुपये करण्यात आला आहे.

 सरकारी बस धावणार-
उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशसह अनेक राज्यांनी परिवहन मंडळाच्या बसेस सोडण्याला मंजूरी दिली आहे. बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशाकडे मास्क असणेबंधनकार आहे. बसला वांवार सॅनेटाइज केलं जाईल. त्याशिवाय बसमध्ये बसताना किंवा उतरताना सोशल डिस्टेन्सिंगचा वापर करणे अनिवार्य केलं आहे.

गो एअरसह इतर विमान कंपन्या देशांतर्गत सेवा सुरू करणार-
स्वस्तात सेवा देणारी विमान कंपनी गो एअर देशांतर्गत विमानसेवा सुरू केली आहे. याशिवाय इतर काही विमानकंपनीनेही २५ मे पासून देशांतर्गत वाहतूक सुरू केली आहे.