जम्मू- काश्मीरमधील हंदवाडा येथे दहशतवादी – सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली असून या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. मृत्यू झालेल्या दहशतवाद्यांमध्ये ‘हिज्बुल मुजाहिद्दीन’ या दहशतवादी संघटनेचा कमांडर  मन्नान बशीर वानी याचा देखील समावेश आहे.  मन्नान हा अलीगढ मुस्लीम विद्यापीठातील (एएमयू) पीएचडीचा विद्यार्थी होता. पीएचडी सोडून तो दहशतवादी संघटनेत सामील झाला होता.

हंदवाडामधील शाहगूंड या गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. सकाळी सुरक्षा दलांनी परिसरात शोधमोहीम राबवली असता चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. मृत्यू झालेल्या दहशतवाद्यांमध्ये ‘हिज्बुल मुजाहिद्दीन’ या दहशतवादी संघटनेचा कमांडर मन्नान बशीर वानी याचा समावेश आहे. वानी (वय २७) आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी शरण येण्याचे आवाहन केले. मात्र, त्यांनी गोळीबार केला आणि यानंतर झालेल्या चकमकीत दोघांचाही खात्मा करण्यात आला.

वानीच्या मृत्यूनंतर पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी प्रतिक्रिया दिली. ‘पीएचडीचा विद्यार्थी असलेल्या वानीचा मृत्यू झाल्याने शेवटी आपलेच नुकसान झाले आहे. सुशिक्षित तरुणांनी दहशतवादी संघटनेत सामील होऊन दहशतवादी मार्ग स्वीकारणे दुर्दैवी आहे. सर्व राजकीय पक्षांनी याचे गांभीर्य ओळखण्याची गरज आहे. शांततेसाठी पाकिस्तान व अन्य घटकांशी चर्चा झालीच पाहिजे’, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, ही चकमक ताजी असतानाच शोपियाँ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू झाला. हल्ल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे.