प्रशांत केणी

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या १५व्या हंगामाला २६ मार्चपासून महाराष्ट्रात प्रारंभ होत आहे. दोन वाढीव संघांमुळे यंदाच्या हंगामचा थरार वाढला आहे. हा हंगाम अधिक रोमांचक आणि आकर्षक करण्यासाठी दोन ‘डीआरएस’, मंकडिंग, झेलबाद होताना क्रीझ ओलांडली तरी नवा फलंदाजच स्ट्राइकला… अशा काही नव्या नियमांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय ‘सुपर ओव्हर’मध्येही अंतिम सामना निकाली ठरला नाही, तर साखळीत गुणानुक्रमे सरस संघ विजेता ठरवला जाणार आहे. एकंदरीच ‘आयपीएल’चे बदललेले स्वरूप कसे असेल, हे जाणून घेऊया.

यंदा कार्यक्रमपत्रिकेचे स्वरूप का आणि कसे बदलले आहे?

यंदाच्या हंगामात लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स हे दोन संघ वाढल्यामुळे आतापर्यंतचेच दुहेरी राऊंड रॉबिन लीगचे सूत्र वापरले असते, तर सामन्यांची संख्या ९४ झाली असती. त्यामुळे १० संघांचे दोन गटांत विभाजन करून सामन्यांची संख्या ७४ (७० साखळी + ४ बाद फेरीचे) करण्यात आली आहे. यापैकी १२ दिवस दुहेरी सामने होतील. प्रत्येक संघाच्या वाट्याला साखळी टप्प्यात १४ सामने येतील. प्रत्येक संघाचा आपल्या गटातील अन्य चार संघांशी दोनदा सामना होईल. याशिवाय अन्य गटातील चार संघांशी एकदा, तर एका संघाशी दोनदा सामना होईल. ‘आयपीएल’मध्ये अशा प्रकारची कार्यक्रमपत्रिका २०११मध्ये वापरण्यात आली होती. त्यावेळी संघांची मांडणी मानांकनानुसार करण्यात आली.

अ-गट : मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, लखनऊ सुपर जायंट्स.

ब-गट : चेन्नई सुपर किंग्ज, सनरायजर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु, पंजाब किंग्ज, गुजरात टायटन्स.

बाद फेरीच्या सामन्यांसाठी काय आखणी केली आहे?

साखळी सामन्यांनंतर गुणानुक्रमे अव्वल चार संघ बाद फेरीसाठी पात्र ठरतील. अव्वल दोन संघांना अंतिम फेरी गाठण्यासाठी दोनदा संधी मिळेल, तर तिसऱ्या आणि चौथ्या संघांना एकच संधी मिळेल. म्हणजेच अव्वल दोन संघ ‘क्वालिफायर-१’चा सामना खेळतील, विजेता संघ थेट अंतिम फेरी गाठेल, तर या सामन्यातील पराभूत संघ ‘क्वालिफायर-२’ सामना खेळेल. तिसरा आणि चौथा संघ ‘एलिमिनेटर’ सामना खेळतील. या सामन्यातील विजेता संघ ‘क्वालिफायर-२’साठी पात्र ठरेल, तर पराभूत संघ स्पर्धेबाहेर जाईल. ‘क्वालिफायर-२’ सामन्याद्वारे अंतिम फेरीसाठी दुसरा संघ ठरेल.

अंतिम सामना ‘सुपर ओव्हर’मध्येसुद्धा ‘टाय’ झाल्यास विजेता कसा ठरेल?

२०१९मधील एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना ‘सुपर ओव्हर’मध्ये ‘टाय’ झाल्यानंतर ‘आयसीसी’च्या नियमानुसार, सरस सीमापार फटक्यांआधारे इंग्लंड संघ विजेता ठरला होता. इंग्लंडने आपल्या डावात २६, तर न्यूझीलंडने १७ चेंडू सीमापार फटकावले होते. या सामन्यानंतर काही महिन्यांतच हा नियमसुद्धा रद्दबातल ठरवण्यात आला आणि सामना निकाली ठरेपर्यंत ‘सुपर ओव्हर’ पुन्हा खेळवण्याचा नवा नियम ‘आयसीसी’ने केला. परंतु यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये मात्र अंतिम सामना ‘सुपर ओव्हर’मध्येसुद्धा ‘टाय’ झाल्यास विजेता ठरवण्यासाठी नवा नियम अमलात आणला आहे. त्यानुसार, साखळी टप्प्यातील गुणानुक्रमे अंतिम फेरीतील दोन संघांपैकी जो संघ सरस असेल, तो विजेता ठरणार आहे.

गेल्या दोन वर्षांत करोनामुळे अनेक सामने ऐनवेळी रद्द करावे लागले आहेत. ‘आयपीएल’साठी कोणता नियम असेल?

जैव-सुरक्षित परीघात करोनाचा शिरकाव होऊन ऐन सामन्यासाठी एखाद्या संघाला अंतिम ११ खेळाडूसुद्धा (किमान ७ भारतीय अनिवार्य) निवडण्यासाठी उपलब्ध नसतील, तर हा सामना रद्द करावा लागेल. त्या सामन्याचे पुन्हा आयोजन केले जाईल. मात्र हा सामना कार्यक्रमपत्रिकेत समाविष्ट करणे शक्य न झाल्यास ‘आयपीएल’च्या तांत्रिक समितीचा निर्णय अंतिम ठरेल.

यंदाच्या ‘आयपीएल’साठी अन्य कोणते नियम अमलात येणार आहेत?

डीआरएसच्या दोन संधी : यंदाच्या हंगामापासून प्रत्येक संघांना प्रत्येक डावात ‘डीआरएस’च्या दोन संधी देण्यात येणार आहेत. ‘आयपीएल’मध्ये ‘डीआरएस’ प्रणालीचा वापर २०१८पासून सुरू झाला. मात्र रिव्ह्यूचे एक अपील वाया गेले तर संघांची ‘डीआरएस’ संधी हुकायची.

झेलबाद झाल्यास नव्या फलंदाजाला फलंदाजी : मेरिलीबॉन क्रिकेट क्लबने (एमसीसी) अलीकडेच नियमांमध्ये बदल केला असून त्यानुसार झेलबाद झालेल्या फलंदाजाने धाव घेतली, तरी नवा फलंदाजच स्ट्राइकवर येणार आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये या नियमाची अंमलबजावणी ऑक्टोबरपासून होणार असली तरी, ‘आयपीएल’मध्ये हा नियम यंदाच्या हंगामापासूनच होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मंकडिंग : ’एमसीसी’ने नुकताच नियम क्रमांक ४१ हा नियम क्र. ३८मध्ये विलीन केला असून, त्यानुसार समोरील बाजूच्या फलंदाजाने क्रिझ सोडल्यास त्याला मंकडिंगऐवजी धावचीत म्हणून बाद ठरवावे, असे म्हटले आहे. ‘बीसीसीआय’ने यंदाच्या ‘आयपीएल’पासूनच हा नियम अंमलात आणला आहे. २०१९च्या ‘आयपीएल’मध्ये फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने जोस बटलरला ‘मंकडिंग’ पद्धतीने बाद केल्यामुळे वाद निर्माण झाला होता.