भाजपने राज्यातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात पाच खासदांना वगळले. निवडून येण्याचा निकष हा यात महत्त्वाचा दिसतो. भाजपने देशभरात ३७० जागांचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी उमेदवारी वाटपानंतर फारसे वाद होणार नाहीत याचीच काळजी घेतली असून, जुन्यांनाही यादीत स्थान दिले. संसदेत चांगली कामगिरी केलेल्यांचीही दखल घेण्यात आली आहे.

मुंबईत धक्का

दिल्लीत भाजपने सातपैकी केवळ मनोज तिवारी या एकमेव खासदाराला पुन्हा संधी दिली. त्याच आधारे मुंबईत जाहीर झालेल्या दोन्ही जागांवर नवे उमेदवार दिलेत. त्यात उत्तर मुंबई ही पक्षासाठी सुरक्षित जागा मानली जाते. अर्थात राजकारणात काही सांगता येत नाही. कारण गोविंदासारख्या नवख्या उमेदवाराने ज्येष्ठ नेते राम नाईक यांना पराभवाचा धक्का दिला होता.मात्र त्याची तुलना आता होत नाही. कारण काँग्रेसची संघटना तितकी भक्कम नाही, तसेच भाजपनेही आपला सामाजिक पाया विस्तारला आहे. उत्तर मुंबईतून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना संधी मिळाली. केंद्रात महत्त्वाची जबाबदारी, राज्यसभेतील पक्षाचे नेतेपद अशा जबाबदाऱ्या पाहता पक्षातील त्यांचे महत्त्व ध्यानात येते. राज्यसभेत असलेल्या केंद्रातील अनेक मंत्र्यांना भाजपने यंदा लोकसभेला उतरवले आहे. बोरिवली, कांदिवली, दहिसर असे भाजपचे प्रभावक्षेत्र असलेला हा मतदारसंघ. आता महाविकास आघाडीतून गोयल यांना कोणाचे आव्हान मिळते याची उत्सुकता आहे. ईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांच्या जागी आमदार मिहीर कोटेचा रिंगणात उतरतील. कोटक यांना एकदाच संधी मिळाली. कोटेचा हे पक्षाचे जुने कार्यकर्ते आहेत, पक्षसंघटनेत विविध जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. संमिश्र वस्तीच्या या मतदारसंघात भाजपपुढे ठाकरे गटाचे कडवे आव्हान असेल.

Western Maharashtra Status and Direction of Co operative Movement Maharashtra Day 2024
पश्चिम महाराष्ट्र: सहकार चळवळ दशा आणि दिशा
uddhav thackeray latest marathi news
“महाराष्ट्रद्वेष्टे सरकार घालवून द्या”, उद्धव ठाकरे यांचे आवाहन; म्हणाले, “एक नेता एक पक्ष असे…”
Dombivli Crime News
डोंबिवली : शालेय विद्यार्थ्यांना ड्रग्ज विकणाऱ्या ६५ वर्षाच्या महिलेला अटक
Drought in the state but plenty of water in Koyna dam
राज्याला दुष्काळाचा झळा, कोयना धरणात मात्र मुबलक पाणी

हेही वाचा : लढाऊ विमान तेजसचा अपघात होण्यापूर्वीच इजेक्शन सीटमुळे वैमानिक कसा बचावला?

पंकजा, मुनगंटीवार यांना संधी

राज्यसभा, विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली की, संभाव्य यादीत ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांचे नाव असायचे. प्रत्यक्षात त्यांना उमेदवारी मिळत नव्हती. अखेर बीडमधून त्यांची बहीण प्रितम यांच्या जागेवर संधी मिळाली आहे. मराठवाड्यातील ही जागा भाजपसाठी सुरक्षित मानली जाते. अजित पवार यांचे निकटवर्तीय धनंजय मुंडे हेदेखील महायुतीत असल्याने भाजपसाठी हे महत्त्वाचे ठरते. एकीकडे भाजपची उमेदवारी घेण्यासाठी पक्षात चढाओढ असताना फारशी इच्छा नसतानाही सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूरमधून पक्षाने उमेदवारी गळ्यात घातली. गेल्या वेळी राज्यातील ही एकमेव जागा काँग्रेसने पटकावली होती. त्यामुळेच मुनगंटीवार यांना तत्कालीन भाजप खासदार हंसराज अहिर यांच्याशी जुळवून घेत हा किल्ला लढवावा लागेल.

पुण्याच्या लढतीकडे लक्ष

भाजपच्या दृष्टीने पुण्याची जागा प्रतिष्ठेची आहे. माजी महापौर व जुने कार्यकर्ते मुरलीधर मोहोळ यांच्यावर पक्षाने विश्वास दाखवला. भाजप संघटनेत कार्यरत असलेले सुनील देवधर तसेच माजी आमदार जगदीश मुळीक हे येथून इच्छुक होते. कसब्यात मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर विधानसभेला पोटनिवडणुकीत ब्राह्मण उमेदवार न दिल्यानेच भाजपला फटका बसल्याची चर्चा होती. त्यातून नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत मेधा कुलकर्णी यांना खासदारकी देत ही नाराजी काहीशी कमी केली. पुण्याचे महापौरपद भूषवल्याने मोहोळ यांचा शहरवासियांना परिचय आहे. यामुळे अन्य उमेदवार देण्याचा धोका भाजपने पत्करला नाही.

हेही वाचा : विश्लेषण : देशाच्या सुरक्षेसाठी कसे घातक ठरतेय ‘सायबर हनी ट्रॅप’? 

उत्तर महाराष्ट्रात धक्कातंत्र?

उत्तर महाराष्ट्राने भाजपला गेल्या दोन दशकांत साथ दिली. जळगावमधून खासदार उन्मेश पाटील यांच्या ऐवजी स्मिता वाघ या उमेदवार असतील. पक्षासाठी महिलांचे संघटन करण्यात त्या आघाडीवर असून, पक्षनिष्ठेचे हे फळ मिळाल्याचे मानले जाते. रावेरमध्ये माजी मंत्री व शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे या उमेदवार आहेत. त्यांना उमेदवारी मिळणार नाही अशी चर्चा होती. धुळ्यातून माजी केंद्रीय मंत्री सुभाष भामरे तर नंदुरबारमधून डॉ. हिना गावित यांना उमेदवारी मिळाली. गावित या लोकसभेत पक्षाची बाजू मांडण्यात आघाडीवर असतात.

हेही वाचा : विश्लेषण : निअँडरथाल शिकारी, इराणी शेतकरी ते मध्य आशियाई गुराखी…भारतीय नक्की उत्क्रांत झाले कसे?

पश्चिम महाराष्ट्रात ‘जैसे थे’…

सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदारसंघात उमेदवारीसाठी चुरस होती. ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते यांचे पुतणे धैर्यशील मोहिते येथून इच्छुक होते. मात्र पक्षाने फलटण येथील रणजित नाईक-निंबाळकर यांनाच पुन्हा संधी दिली. आता त्यांचे पक्षांतर्गत विरोधक काय करतात त्यावर येथील निकाल अवलंबून असेल. अहमदनगरमध्ये (आता अहिल्यानगर) पुन्हा सुजय विखे तसेच सांगलीत संजयकाका पाटील यांच्यावरच विश्वास दाखवला आहे. भाजपचे जे देशभरात ३७० जागांचे लक्ष्य ठेवले आहे, त्यासाठी उमेदवारी देताना मोठे बदल केले नाहीत. विदर्भातील महत्त्वाच्या अशा नागपूरच्या जागेवर ज्येष्ठ नेते नितीन गडकरी हे तिसऱ्यांदा रिंगणात असतील. पहिल्या यादीत त्यांचे नाव नसल्याने विरोधकांनी टीका केली होती. अकोल्यातून माजी मंत्री संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप यांना संधी मिळाली. मराठवाड्यात रावसाहेब दानवे, प्रताप पाटील-चिखलीकर यांना अपेक्षेप्रमाणे उमेदवारी मिळाली. लातूरमध्ये चुरस होती, मात्र सुधाकर शृंगारे हे मतदारसंघातील चांगल्या कामगिरीमुळे उमेदवारी मिळवण्यात यशस्वी झाले.

hrishikesh.deshpande@expressindia.com