नागपूर ते मुंबई अंतर केवळ आठ तासांत पार करता यावे यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पातील ७६ किमीचा इगतपुरी ते आमणे हा शेवटचा टप्पा अखेर आता गुरुवारपासून (५ जून) वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. शेवटच्या टप्प्याच्या अनुषंगाने आता संपूर्ण ७०१ किमीचा समृद्धी महामार्ग कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे आता मुंबई ते नागपूर अंतर १६ तासांऐवजी केवळ आठ तासात पार करण्याचे प्रवाशांचे-वाहनचालकांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. या पार्श्वभूमीवर समृद्धी महामार्गाचा घेतलेला हा आढावा…
समृद्धी महामार्ग प्रकल्पाची गरज का?
मुंबई ही राज्याची राजधानी तर नागपूर ही उपराजधानी. ही दोन्ही शहरे राज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची. मात्र रस्ते मार्गे मुंबईहून नागपूरला आणि नागपूरवरून मुंबईला जाण्यासाठी बरीच कसरत करावी लागते. १५ ते १६ तास या प्रवासासाठी लागतात. त्यामुळे हे अंतर कमी करण्यासाठी, प्रवास वेगवान, सुकर करण्यासाठी नागपूर ते मुंबई महामार्गाची संकल्पना पुढे आली. सहाजिकच रस्ते विकास करणाऱ्या एमएसआरडीसीवर या प्रकल्पाची जबाबदारी टाकण्यात आली. २०१५ मध्ये प्रकल्पाची घोषणा झाली आणि २०१६ मध्ये सरकारने जमीन संपादनास मान्यता दिली. २०१८ मध्ये समृद्धी महामार्ग प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. भूमिपूजनानंतर प्रकल्पाच्या कामास सुरुवात झाली. या प्रकल्पास हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असे नाव देण्यात आले. मुंबई ते नागपूर हे अंतर केवळ आठ तासांत पार करता यावे हा या प्रकल्पाचा मुख्य हेतू होताच. मात्र त्याच वेळी या महामार्गाला जोडणाऱ्या १० जिल्ह्यातील गावांचा आर्थिक आणि औद्योगिक विकास व्हावा हाही उद्देश होता. या दृष्टीनेच समृद्धी महामार्गाचा आराखडा तयार करत प्रकल्प पुढे नेण्यात आला.
प्रकल्पाचे वैशिष्ट्य काय?
नागपूर ते मुंबई असा ७०१ किमीचा सहा पदरी असा हा महामार्ग आहे. राज्यातील १० जिल्हे आणि ३९० गावांना जोडणारा हा महामार्ग पूर्ण झाल्यास मुंबई ते नागपूर अंतर केवळ आठ तासात पूर्ण होणार आहे. सध्या हेच अंतर पार करण्यासाठी १५ ते १६ तास लागतात. या प्रकल्पासाठी एकूण २०८२० हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. महामार्गासाठी यातील ८५२० हेक्टर जागेचा वापर करण्यात आला आहे. तर १०१८० हेक्टर जागेवर टाऊनशिप उभारल्या जाणार आहेत. या प्रकल्पाची अनेक वैशिष्ट्य आहेत. यात एकूण २४ छेदमार्ग (इंटरचेंजेस) असून यामुळे अनेक गावे समृद्धी महामार्गाशी जोडली जाणार आहेत. पाच बोगदे, ५० हून अधिक उड्डाणपूल, ४०० हून अधिक भुयारी मार्ग, ३०० हून अधिक पादचारी भुयारी मार्ग आणि वन्यजीवांसाठी भुयारी, उन्नत मार्ग असे १६०० हून अधिक पूल या प्रकल्पात समाविष्ट आहेत. या प्रकल्पाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे समृद्धीवरील वेग मर्यादा ताशी १५० किमी अशी आहे. पण प्रत्यक्षात या मार्गावरून ताशी १२० किमीने प्रवास करता येणार आहे.
अखेर नागपूर ते मुंबई प्रवास आठ तासांत शक्य?
समृद्धी महामार्ग प्रकल्पातील संपूर्ण ७०१ किमीचा महामार्ग याआधीच वाहतूक सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र अनेक कारणांनी या प्रकल्पास विलंब झाला. दरम्यान या प्रकल्पातील नागूपर ते शिर्डी हा टप्पा ११ डिसेंबर २०२२ मध्ये वाहतूक सेवेत दाखल झाला. त्यानंतर शिर्डी ते भरवीर हा टप्पा मे २०२३ मध्ये आणि मार्च २०२४ मध्ये भरवीर ते इगतपुरी टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाला. हे टप्पे वाहतूक सेवेत दाखल झाल्यानंतर महत्त्वाचा, शेवटचा आणि मुंबईकरांच्या दृष्टीने महत्त्वाचा असा इगतपुरी ते आमणे टप्पा केव्हा सुरु होणार याची प्रतीक्षा सर्वांनी होती. अखेर आता ही प्रतीक्षा संपली आहे. हा शेवटचा टप्पा गुरुवारी, ५ जूनला वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. आता नागपूर ते मुंबई अंतर १६ तासांऐवजी केवळ आठ तासांत पार करणे शक्य होणार आहे. राज्याची राजधानी आणि राज्याची उपराजधानी जवळ येणार आहे. समृद्धीचा संपूर्ण मार्ग वाहतूक सेवेत दाखल झाल्याने आता प्रवास अतिजलद होणार आहेच. पण त्याचवेळी आता समृद्धीलगतच्या गावांचा, शहरांचा विकास साधला जाणार आहे. दरम्यान नागपूर ते मुंबई अंतर आठ तासात समृद्धी महामार्गाद्वारे पार करण्यासाठी वाहनचालक-प्रवाशांना पथकर अर्थात टोल मोजावा लागणार आहे.
वेगवान प्रवासासाठी पथकर?
आठ तासात मुंबई ते नागपूर प्रवास करण्यासाठी प्रवाशांना, वाहनचालकांना पथकर मोजावा लागणार आहे. या मार्गावर एकूण २६ पथकरनाके असून जितका किमी प्रवास तितका पथकर भरावा लागणार आहे. महत्त्वाचे म्हणजे नुकताच समृद्धी महामार्गावरील पथकरात वाढ करण्यात आली आहे. १ एप्रिल २०२५ पासून समृद्धी महामार्गावरील नवीन पथकर दर लागू झाले आहेत. समृद्धी महामार्गावरील पथकरात एमएसआरडीसीने थेट १९ टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे मुंबई ते नागपूर प्रवासासाठी भरमसाट पथकर मात्र मोजावा लागणार हे खरे. नव्या पथकर दरानुसार नागपूर ते इगतपुरी प्रवासासाठी हलक्या प्रवासी वाहनांना १०८० रुपयांऐवजी १२९० रुपये तर हलकी व्यावसायिक वाहने, मिनी बससाठी १७४५ रुपयांऐवजी २०७५ रुपये पथकर मोजावा लागणार आहे. तर बस, दोन आसांच्या ट्रकसाठी ३६५५ रुपयांऐवजी ४३५५ रुपये आणि तीन आसांच्या व्यावसायिक वाहनांसाठी ३९९० रुपयांऐवजी ४७५० रुपये पथकर लागेल. अवजड बांधकाम यंत्रसामग्रीसाठी ५७४० रुपयांऐवजी आता ६८३० रुपये तर अतिअवजड वाहनांनासाठी ६९८० रुपयांऐवजी ८३१५ रुपये पथकर भरावा लागेल. त्याचवेळी इगतपुरी ते आमणे टप्प्याचे काम पूर्ण झाले असून आता केवळ लोकार्पणाची प्रतीक्षा आहे. मात्र या प्रवासासाठी वाहनचालक-प्रवाशांना १४४५ रुपये इतका (एकेरी प्रवास) पथकर मोजावा लागणार आहे. एकूणच समृद्धी महामार्गामुळे प्रवास अतिजलद होत असला तरी हा प्रवास महागडा ठरत आहे.