Rath Yatra of Lord Jagannath ओडिशातील जगप्रसिद्ध भगवान जगन्नाथाच्या भव्य रथयात्रेची सुरुवात शुक्रवार (२७ जून)पासून होणार आहे. ही परंपरा प्रदीर्घ काळापासून चालत आली आहे. हिंदू पौराणिक कथेनुसार, भगवान जगन्नाथ आणि त्यांचे भाऊ भगवान बलभद्र व बहीण देवी सुभद्रा त्यांच्या जन्मस्थळी नऊ दिवसांसाठी जातात. यंदा भगवान जगन्नाथाच्या वार्षिक रथयात्रेसाठी सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थापन पाहण्यासाठी १०,००० हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना पुरी येथे पाठविण्यात आले आहे.

या यात्रेला ३० लाखांहून अधिक भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे, ज्यात भारतीयांसह विदेशी नागरिकांचादेखील समावेश असेल. यात्रेदरम्यान भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र व देवी सुभद्रा यांच्या मूर्ती गुंडीचा मंदिरात नेल्या जातील. तिथे या मूर्ती ५ जुलै रोजी येणाऱ्या ‘बहुदा यात्रा’पर्यंत राहतील. या यात्रेचे महत्त्व काय? या रथयात्रेत काय समाविष्ट असेल? कोणकोणते विधी असतील? त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

ओडिशातील जगप्रसिद्ध भगवान जगन्नाथाच्या भव्य रथयात्रेची सुरुवात शुक्रवार (२७ जून)पासून होणार आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

रथयात्रेची सुरुवात

दरवर्षी आषाढ महिन्यातल्या शुक्ल पक्षातील दुसऱ्या दिवसापासून ही रथयात्रा सुरू होते. १२ व्या शतकातील जगन्नाथ मंदिरापासून त्यांच्या मावशीचे घर असलेल्या गुंडीचा मंदिरापर्यंत भगवान जगन्नाथ आणि त्यांच्या दोन भावंडांच्या प्रवासाची आठवण म्हणून ही रथयात्रा काढली जाते. मौसीमा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवी अर्धसिनी ही देवांची मावशी मानली जाते. पहाडी विधी नावाच्या औपचारिक मिरवणुकीनंतर तिन्ही देवांच्या मूर्तींना तीन मोठ्या सजवलेल्या रथांवर चढवले जाते आणि नंतर गुंडीचा मंदिरापर्यंत नेले जाते. मंदिरापासून हे अंतर सुमारे तीन किलोमीटर आहे. पुरी शहरातील बडा दंडा (मोठा रस्ता)वर लाखो भाविक हे रथ ओढतात.

हिंदू पौराणिक कथांमध्ये पुरीला एक महत्त्वाचे स्थान आहे. पुरी हे चार धामांपैकी एक म्हणून ते पूजले जाते. पुरीमध्ये भगवान विष्णूचा अवतार भगवान जगन्नाथ यांची त्यांच्या भावंडांसह पूजा केली जाते. भगवान जगन्नाथाचे हे ८०० वर्षे जुने मंदिर आहे. ही रथयात्रा प्रत्यक्ष पाहिल्यास १००० यज्ञांचे पुण्य प्राप्त होते, असे मानले जाते. पुरी मंदिराशी संबंधित धार्मिक ग्रंथ बामदेव संहितेनुसार, जो कोणी यात्रेकरू गुंडीचा मंदिराच्या सिंहासनावर (पवित्र आसनावर) चार देवतांना एकत्र बघतो त्याला त्याच्या पूर्वजांसह अनंत काळासाठी वैकुंठात स्थान मिळते. जगन्नाथ मंदिरात बिगर-हिंदूंना प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे जेव्हा ही यात्रा होते, तेव्हा या यात्रेत सहभागी होण्यासाठी अनेक विदेशी नागरिक येतात. असे मानले जाते की, विश्वाचे स्वामी असणारे भगवान जगन्नाथ या रथयात्रेदरम्यान आपल्या सर्व भक्तांना भेटण्यासाठी आपल्या गर्भगृहातून बाहेर पडतात.

तीन रथांचे महत्त्व

जग्गनाथ रथयात्रेत भगवान बलभद्राचा तलध्वज रथ, देवी सुभद्राचा दर्पदलन रथ आणि भगवान जगन्नाथाचा नंदीघोष रथ, असे तीन पवित्र रथ असतात. दरवर्षी स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या झाडांच्या लाकडापासून हे रथ तयार केले जातात. या रथांचा रंग, उंची, व्यास ठरलेले आहेत. रथात लाकडी घोडे, संरक्षक देवता आणि सारथीदेखील असतात. जवळजवळ २०० सुतार, कामगार, लाकूड काम करणारे, कलाकार व चित्रकार सर्व जण अक्षय्य तृतीयेपासून दररोज १२ तास काम करून हे रथ तयार करतात.

जवळजवळ दोन महिन्यांच्या आधी रथ तयार करण्याचे काम सुरू केले जाते. कामगार या कामाला वंशपरंपरागत सेवा मानतात. या कामगारांनी लाकूडकाम किंवा आधुनिक यंत्रसामग्री किंवा उपकरणे वापरण्याचे कोणतेही प्रशिक्षण घेतलेले नाही, ते त्यांच्या कुटुंबातील अनुभवी वडीलधाऱ्या व्यक्तींकडून ही कला शिकतात. रथ तयार करण्यासाठी पारंपरिक पद्धती आणि तंत्रे वापरली जातात.

या रथोत्सवात कोणकोणते विधी असतात आणि त्यांचे महत्त्व काय?

छेरा पन्हारा : रथ ओढण्यापूर्वी पुरी राजघराण्याचे वंशज ‘छेरा पन्हारा’ नावाचा एक विशेष विधी करतात. या विधीत ते सोनेरी झाडूने रथांची स्वच्छता करतात. ही कृती हे दर्शविते की, सर्व भक्त त्यांच्या परमेश्वरासमोर एकसमान आहेत. १९७० मध्ये १७ व्या वर्षी सिंहासनावर बसलेले पुरी राजा गजपती दिव्यसिंह देब १९७१ पासून छेरा पन्हारा विधी करीत आहेत.

बहुदा यात्रा : हा परतीचा उत्सव असतो. बहुदा यात्रा आषाढ शुक्ल दशमी (१० व्या दिवशी)ला आयोजित केली जाते. पुरीतील प्रमुख मंदिरात परतण्यापूर्वी देवतांना मौसीमा मंदिरात (त्यांच्या मावशीचे मंदिर) तांदूळ, नारळ, मसूर व गूळ यांच्यापासून तयार केलेला ‘पोडा पिठा’ नावाचा एक खास पदार्थ अर्पण केला जातो.

सुन बेषा : यात्रेच्या एक दिवसानंतर सिंहदरबारासमोरील रथांवर देवतांना मुकुटांसह सोन्याचे दागिने, सोन्याचे हात व पाय लावून सजवले जाते. त्याला सुन बेषा (सोनेरी पोशाख), असे म्हणतात.

नीलाद्री बिजे : देवतांच्या घरी परतण्याच्या प्रथेला ‘नीलाद्री बिजे’ असेही म्हणतात. हा उत्सव आषाढ महिन्याच्या १२ व्या दिवशी साजरा केला जातो. हा रथयात्रेचा शेवटचा दिवस असतो. तिन्ही देवतांना पहाडी या विधीनुसार पुन्हा गर्भगृहात नेले जाते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रसगोला दिवस : भगवान जगन्नाथ यांनी गुंडीचा मंदिरात रथावर न नेल्यामुळे रागावलेल्या लक्ष्मीला शांत करण्यासाठी भाविक रसगोला (चीजपासून तयार केला जाणारा गोड पदार्थ) अर्पण करतात. गेल्या काही वर्षांपासून ओडिशातील लोक नीलाद्री बिजेचा दिवस रसगोला दिवस म्हणूनदेखील साजरा करतात.