कोल्हापूर : बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीला आमदार प्रकाश आबिटकर घाबरले आहेत, असा आरोप कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार के. पी. पाटील यांनी केला. कारखान्याची निवडणूक नियमबाह्य शासकीय आदेश काढून पुढे ढकलली असल्याने या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत, अशी माहिती त्यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
बिद्री कारखान्याची निवडणूक सहकार विभागाच्या नियोजनानुसार वेळेत सुरू होती. पण शिंदे गटाचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी पावसाळा असल्याने निवडणूक पुढे ढकलावी, अशी मागणी केल्याने शासनाने निवडणूक सप्टेंबरनंतर घेण्याचे आदेश दिले आहेत.




हेही वाचा – कोल्हापूर : घोणसने ७० पिलांना जन्म दिला; सर्पमित्राकडून जीवदान
‘बिद्री’लाच स्थगिती का ?
त्यावर के. पी. पाटील म्हणाले, निवडणूक होण्यासाठी आम्ही तयारी केली होती. गेले वर्षभर विरोधात पत्रकबाजी करणाऱ्या आबिटकर यांना सभासदांतून स्थान मिळेनासे झाल्याने सत्तेचा गैरवापर करून निवडणुकीला स्थगिती आणण्याचा चुकीचा प्रकार केला आहे. जिल्ह्यात हमिदवाडा, भोगावती कारखाना तसेच पश्चिम महाराष्ट्रात अनेक संस्थांचा निवडणूक कार्यक्रम सुरू असताना केवळ ‘बिद्री’ची निवडणूक थांबवणे हे कायदाबाह्य असल्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल करीत आहोत.
हेही वाचा – राष्ट्रवादी पाठोपाठ कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचाही दावा
तर या थेट मैदानातचं
‘बिद्री’ची निवडणूक जिंकता येत नाही म्हणून सत्तेच्या माध्यमातून आडकाठी आणू नये. त्यापेक्षा हिंमत असेल तर निवडणूक रिंगणात उतरावे, असे आव्हान के. पी. पाटील यांनी आमदार आबिटकर यांच्यासह विरोधकांना दिले.