आयपीएलच्या आगामी हंगामात नवीन बदल पहायला मिळणार आहेत. नवीन आयपीएल अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांच्या अध्यक्षतेखाली आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलची मुंबईत बैठक पार पडली. यामध्ये No-Ball साठी स्वतंत्र पंच ठेवण्याबाबत चर्चा झाली असून, Power Player बद्दलचा निर्णय तूर्तास रद्द करण्यात आला आहे. गेल्या हंगामात आयपीएलमध्ये पंचांची खराब कामगिरी चर्चेचा विषय ठरला होता. त्यामुळे या हंगामात असे प्रकार टाळण्यासाठी No-Ball करता स्वतंत्र पंचांची नेमणूक करण्याचा गव्हर्निंग काऊन्सिलचा विचार आहे.

काही दिवसांपूर्वी आयपीएलमध्ये Power Player या संकल्पनेअंतर्गत बदली खेळाडूला संघात स्थान देण्याच्या निर्णयबाबद्दल चर्चा सुरु होती. यासाठी सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत हा प्रयोग राबवण्यात येणार होता. मात्र वेळेच्या अभावामुळे हा निर्णय तूर्तास रद्द करण्यात आलेला आहे. याचसोबत गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत खेळाडूंची अदलाबदल, परदेशी खेळाडूंची उपलब्धता आणि अन्य विषयांवर चर्चा झाली.

“सर्व गोष्टी सुरळीत पार पडल्या तर आगामी हंगामात No-Ball साठी स्वतंत्र पंच पहायला मिळेल. ही संकल्पना थोडीशी विचीत्र आहे, पण गेल्या हंगामातील चुका पाहता यावर चर्चा होणं गरजेचं होतं. यासाठी तंत्रज्ञानाचाही वापर केला जाईल. या पंचाला दुसरं कोणतंही काम देण्यात येणार नाही, तो फक्त No-Ball आहे की नाही एवढच काम करेल.” गव्हर्निंग काऊन्सिलच्या सदस्याने पत्रकारांना माहिती दिली.

आयपीएलच्या गतहंगामात पंच एस. रवी यांनी दिलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीला आलेला संताप सर्वांनी अनुभवला आहे. इतकच नव्हे तर कॅप्टन कूल नावाने परिचीत असलेला धोनीही गेल्या हंगामात पंचांनी दिलेल्या चुकीच्या निर्णयामुळे मैदानात येऊन वाद घालताना पहायला मिळाला होता. त्यामुळे आगामी हंगामात अशा चुका पहायला मिळणार नाही अशी आशा क्रिकेट प्रेमी करत आहेत.