आयपीएलचा हंगाम पार पडल्यानंतर संपूर्ण जगातील क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलेलं आहे विश्वचषक स्पर्धेकडे. ३० मे पासून इंग्लंडमध्ये या स्पर्धेला सुरुवात होते आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ या स्पर्धेत उतरणार आहे. भारतीय संघ या स्पर्धेत विजतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सलामीची जोडी रोहित आणि शिखर धवनचं कौतुक केलं आहे.

अवश्य वाचा – अनुभवाच्या जोरावर पंतऐवजी कार्तिकला विश्वचषक संघात स्थान !

“सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मा – शिखर धवन ही सलामीची जोडी सर्वोत्कृष्ट आहे. विश्वचषक स्पर्धेत या दोन्ही खेळाडूंच्या कामगिरीवर भारतीय संघाची मदार राहणार आहे.” रवी शास्त्री cricbuzz.com संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. या दोन्ही खेळाडूंनी केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर भारतीय संघाने गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक महत्वाचे सामने जिंकले आहेत.

अवश्य वाचा – विश्वचषकाची संधी गमावली, ऋषभ पंतला भारत अ संघात स्थान

रोहित शर्मा – शिखर धवन जोडीने २०१८ साल भारताकडून गाजवलं आहे. २०१८ सालात दोन्ही खेळाडूंनी १९ डावांमध्ये १०३० आणि ८९७ धावा केल्या आहेत. विराट कोहलीनंतर सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत या दोन्ही खेळाडूंनी आपलं नाव पक्क केलं आहे. त्यातचं आयपीएलमध्ये शिखर धवनच्या दिल्ली कॅपिटल्स संघाने ७ वर्षांनी बाद फेरीत प्रवेश मिळवला होता. तर रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने विजेतेपद मिळवलं होतं. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेत या जोडीच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – हार्दिक पांड्यासारखा प्रतिभावन खेळाडू भारतीय संघात नाही – विरेंद्र सेहवाग