रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने १८ वर्षांच्या मोठ्या प्रतिक्षेनंतर आयपीएलचे जेतेपद आपल्या नावे केले. विराट कोहलीने आनंदाश्रूंनी हा विजय साजरा केला. आरसीबीच्या चाहत्यांबरोबर या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी संघ बंगळुरूसाठी दुसऱ्या दिवशी रवाना झाला. यादरम्यान चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीची मोठी घटना घडली, ज्यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला.

४ जून रोजी बेंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक जण जखमी झाले आहेत. या प्रकरणात भारतीय क्रिकेटपटू आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाचा सदस्य विराट कोहलीविरुद्धही तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार सामाजिक कार्यकर्ते एचएम वेंकटेश यांनी बेंगळुरूमधील क्यूबन पार्क पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली आहे. पण पोलिसांनी अद्याप एफआयआर नोंदवलेला नाही.

बेंगळुरूच्या क्यूबन पार्क पोलिस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या तक्रारीत व्यंकटेश यांनी आरोप केला आहे की कोहलीने आयपीएलमध्ये “जुगाराला प्रोत्साहन दिले” आणि यामुळे लोकांना मोठ्या संख्येने जमण्यास भाग पाडले, ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली. “आयपीएल हा खेळ नाही तर जुगाराचा एक प्रकार आहे ज्याने क्रिकेटला भ्रष्ट केलं आहे. विराट कोहली हा आरसीबी संघाचा सर्वात प्रमुख चेहरा आहे आणि तो या जुगारात सामील आहे,” असे व्यंकटेश म्हणाले. कोहली आणि त्याच्या संघावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे.

विराट कोहलीविरूद्ध FIRबद्दल पोलीस काय म्हणाले?

एएनआय वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, विराट कोहलीविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीचा आढावा सध्याच्या प्रकरणाच्या चौकशीचा भाग म्हणून घेतला जाईल. त्याच्याविरुद्ध अद्याप वेगळा एफआयआर दाखल केलेला नाही.

Bengaluru Stamped: आतापर्यंत किती जणांना अटक करण्यात आली आहे?

या प्रकरणात आतापर्यंत एकूण चार जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये आरसीबीचे वरिष्ठ अधिकारी निखिल सोसाळे आणि इव्हेंट मॅनेजमेंटशी संबंधित तीन जणांचा समावेश आहे. क्यूबन पार्क पोलिस आणि सेंट्रल क्राइम ब्रांच (सीसीबी) यांनी संयुक्त कारवाईत ६ जून रोजी सकाळी केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर, वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना सत्र न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे त्यांना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले.

५ जून रोजी पोलिसांनी आरसीबी फ्रँचायझी, इव्हेंट कंपनी डीएनए एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (केएससीए) विरुद्ध हत्येचा प्रयत्न, बेकायदेशीर जमवाजमव आणि इतर गंभीर आरोपांखाली एफआयआर दाखल केला होता. त्यानंतरच अटकेची कारवाई करण्यात आली.

कर्नाटक उच्च न्यायालयाने केएससीए अधिकाऱ्यांना अंतरिम दिलासा दिला आहे. अध्यक्ष रघु राम भट, सचिव ए. शंकर, कोषाध्यक्ष ईएस जयराम आणि इतर अधिकाऱ्यांनी एफआयआर रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने राज्य पोलिसांना सध्या त्यांच्याविरुद्ध कोणतीही कठोर कारवाई करू नये असे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी ९ जून रोजी होणार आहे. आरसीबीचे अटक झालेले अधिकारी निखिल सोसाळे यांनीही उच्च न्यायालयात याचिका दाखल करून त्यांची अटक बेकायदेशीर ठरवली आहे. त्यांनी म्हटले आहे की, कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय किंवा प्राथमिक तपासाशिवाय ही अटक करण्यात आली आहे आणि ती रद्द करण्यात यावी.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चिन्नास्वामी स्टेडियमबाहेरील अपघातानंतर, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कठोर भूमिका घेतली आणि राज्याचे डीजीपी आणि आयजीपींना आरसीबी, इव्हेंट मॅनेजमेंट आणि केएससीएच्या जबाबदार अधिकाऱ्यांना तात्काळ अटक करण्याचे निर्देश दिले. त्यांनी याला ‘निष्काळजीपणा’ म्हटले. त्याच वेळी, बेंगळुरूचे पोलिस आयुक्त बी. दयानंद, अतिरिक्त आयुक्त विकास कुमार विकास, डीसीपी (मध्य) शेखर एचटी, एसीपी बालकृष्ण आणि क्यूबन पार्कचे पोलिस निरीक्षक गिरीश ए.के. यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.