IPL 2024, Mumbai Indians vs Rajasthan Royals: आयपीएलमधील चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्सने यंदाच्या हंगामातील सलग तीन सामने गमावले आहेत. हंगाम सुरू होण्यापूर्वीच हार्दिकची रोहित शर्माच्या जागी संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली. फ्रँचायझीच्या या निर्णयामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी असून त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेतच. पण यासोबतच पंड्याच्या नेतृत्त्वाखाली मुंबई संघाची कामगिरीही ढासळली आहे, संघाला अद्याप एकही विजय मिळवता आलेला नाही. आता याबाबत भारताचा माजी खेळाडू मनोज तिवारीने मोठे वक्तव्य केले आहे. तो म्हणाला, मुंबईचे कर्णधारपद पंड्याकडून पुन्हा रोहित शर्माकडे सोपवले जाऊ शकते.
राजस्थानविरुद्धच्या सामन्यात झालेल्या मुंबईच्या पराभवानंतर क्रिकबझशी बोलताना तिवारीने आपले मात मांडले. आयपीएल २०२४च्या हंगामात खराब सुरुवात केल्यानंतर रोहितला पुन्हा एकदा मुंबईचा कर्णधार बनवले जाऊ शकते, असे तो म्हणाला. राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर पहिल्या डावात मुंबईला ९ बाद १२५ धावांवर रोखले आणि ६ विकेट्स आणि २७ चेंडू शिल्लक असताना १२६ धावांचा सहज पाठलाग करत विजय मिळवला. पंड्याच्या नेतृत्वाखाली, मुंबईला गुजरात आणि हैदराबादविरुद्ध अनुक्रमे ६ धावांनी आणि ३१ धावांनी पराभव पत्करावा लागला आहे.
मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाबाबत मनोज तिवारी म्हणाला, “मुंबईचे कर्णधारपद पुन्हा रोहित शर्माकडे सोपवले जाऊ शकते. माझ्या मते तरी मुंबई इंडियन्सचे मालक हा निर्णय घेण्यास अजिबातच मागेपुढे पाहणार नाहीत. रोहितच्या नावे पाच आयपीएलची विजेतेपदे असतानाही त्यांनी रोहितकडून कर्णधारपद काढून घेत हार्दिक पांड्याला देण्याचा निर्णय घेतला होता. संघाचा कर्णधार बदलणे ही खूप मोठी गोष्ट आहे. या हंगामात त्यांनी अद्याप एक गुणही आपल्या खात्यात जमा केलेला नाही. संघाचे नेतृत्त्व पाहता असं ही नाही की कर्णधार नेतृत्त्व चांगलं करतोय पण नशीब साथ देत नाहीये. मुळात संघाचे नेतृत्व नीट होताना दिसत नाहीये.”
मुंबई इंडियन्सचा आता पुढील सामना ७ एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध होणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावरच होणार आहे. त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये मुंबईचा संघ कशी कामगिरी करणार यावर सर्वांच्या नजरा आहेत.