Virat Kohli Anushka Sharma After IPL 2025 Final: मंगळवारी रात्री आरसीबीच्या तमाम चाहत्यांनी दिवाळी साजरी केली. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं १८ वर्षांत पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. अंतिम सामन्यात आरसीबीनं पंजाब किंग्जचा पराभव केला आणि मैदानावरील आरसीबीच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. विराट कोहलीसह RCB च्या सर्वच खेळाडूंना यावेळी भावना अनावर झाल्या. सामन्यानंतर स्टार स्पोर्ट्सचशी बोलताना विराट कोहलीनं आपल्या याच भावना व्यक्त केल्या. आपल्याला आज रात्री एखाद्या लहान बाळाप्रमाणे झोप लागेल, असं विराट म्हणाला. यावेळी विराटनं अनुष्काबद्दलच्या भावनाही व्यक्त केल्या.

आरसीबीचं पहिलं जेतेपद!

आयपीएलच्या विजेतेपदासाठी १९१ धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या पंजाब किंग्जची सुरुवात चांगली झाली. पाचव्या षटकापर्यंत जवळपास १० च्या सरासरीने दोन्ही सलामीवीरांनी धावा कुटल्या. पण पाचव्या षटकात भरवशाच्या जॉश हेझलवूडनं आरसीबीला पहिली विकेट मिळवून दिली. फिल सॉल्टनं प्रियांश आर्याचा सीमारेषेवर अफलातून झेल टिपला आणि पंजाबच्या घसरगुंडीला सुरुवात झाली. तरीदेखील पंजाबनं हिकमती खेळी करत शेवटच्या षटकापर्यंत सामना नेला. शेवटच्या षटकात २९ धावांची गरज असताना हेझलवूडकडे कर्णधार रजत पाटीदारनं चेंडू सोपवला. पहिले दोन चेंडू निर्धाव गेल्यानंतर पुढे शशांकनं तीन षटकार आणि एक चौकार लगावला. पण तोपर्यंत आरसीबीच्या विजयावर शिक्कामोर्तब झालं होतं. आरसीबीनं ६ धावांनी आयपीएलचा अंतिम सामना जिंकला.

विराट म्हणतो, “अनुष्कासाठीही ११ वर्षांची…”

आरसीबीच्या विजयावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर मैदानावर भावनिक वातावरण निर्माण झालं होतं. आरसीबीच्या सर्वच चाहत्यांसह खेळाडू व सपोर्ट स्टाफलाही भावना अनावर झाल्या होत्या. या भावना विराटनं सामन्यानंतर बोलून दाखवल्या. आपल्या निराशेच्या काळात अनुष्का आपल्यासोबत होती, असं विराट यावेळी म्हणाला.

“अनुष्का स्वत: बंगळुरूमध्ये लहानाची मोठी झाली. त्यामुळे RCB शी तिचं खास नातं आहे. २०१४ सालापासून अनुष्का आरसीबीला पाठिंबा देत आली आहे. त्यामुळे तिच्यासाठीही ही ११ वर्षांची प्रतीक्षा ठरली. न थकता सातत्याने सामने पाहायला येणं, कठीण परिस्थितीतील सामने पाहाणं, अगदी हातातोंडाशी आलेला विजय निसटून जाताना बघणं हे सगळं तिनं पाहिलं आहे, सहन केलं आहे. त्याच्याही पलीकडे जाऊन तुमचा जोडीदार तुम्हाला खेळता यावं यासाठी काय काय करतो, कोणत्या तडजोडी करतो, किती बांधीलकी दाखवतो, तुमच्या बऱ्या-वाईट काळात तुम्हाला साथ देतो हे कुणीच शब्दांत सांगू शकत नाही”, असं विराट कोहलीनं यावेळी नमूद केलं.

अनुष्कासाठीही हा विजय खूप स्पेशल – विराट कोहली

“अनुष्का स्वत: या काळात भावनिकदृष्ट्या खूप काही सहन करत होती. प्रसंगी मला निराश आणि भरकटलेलं पाहून तिलाही प्रचंड वेदना होत होत्या. पण तिचं आरसीबीच्या प्रत्येक सामन्याला येणं, बँगलोरच्या संघाशी इतकं घट्ट नातं टिकवून ठेवणं, आरसीबीशी बांधील राहणं या सगळ्यामुळे हे आयपीएल विजेतेपद तिच्यासाठीही खूप खूप स्पेशल आहे. तिलाही या विजयाचा खूप गर्व वाटत असेल”, असंही विराट कोहली अनुष्काबाबत म्हणाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, व्यावसायिक क्रिकेट खेळण्यातील आव्हानांबाबतही विराटनं यावेळी भाष्य केलं. “जेव्हा तुम्ही व्यावायिक क्रिकेट खेळायला लागता, तेव्हाच तुम्हाला पडद्यामागे काय काय गोष्टी घडत असतात ते समजतं. या स्तरावर खेळणाऱ्या सर्वच खेळाडूंच्या, त्यांच्या आप्तस्वकीयांच्या भावनाही तुम्हाला तेव्हाच कळतात”, असंही कोहली म्हणाला.