नितीन पखाले

सर्वच क्षेत्रांत मागास जिल्हा अशी यवतमाळची अपकीर्ती आहे. शेतकरी आत्महत्या, कुमारी माता, बालविवाह, शैक्षणिक गैरसोयी इत्यादी अनेक प्रश्नांची सर्वत्र चर्चा होते. परंतु, अशा प्रतिकूल वातावरणात जिल्ह्य़ातील तीन तरुणांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी)परीक्षेत एकाचवेळी बाजी मारून यवतमाळचा गौरव वाढवला आहे.

नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या निकालात यवतमाळ शहरातील अजरोद्दीन जहिरोद्दीन काजी (३१५) याच्यासह वणी तालुक्यातील अभिनव प्रवीण इंगोले (६२४ ) आणि सुमित सुधाकर रामटेके (७४८) यांना बिकट परिस्थितीतूनच प्रशासकीय सेवेची वाट गवसली. यूपीएससी परीक्षेत जिल्ह्य़ाच्या इतिहासात प्रथमच हे तीन विद्यार्थी एकाच वेळी यशस्वी झाले आहेत. ते स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे ‘आयकॉन’ ठरले आहेत.

अल्पसंख्याक समाज आजही उपेक्षित आहे. समाजात शिक्षणाप्रति अनास्था आहे. समाजातील मुलांचे प्राथमिक, उच्च शिक्षण सरकारी शिक्षण संस्थांमधून पूर्ण करण्याकडे पालकांचा कल आहे. आर्थिक अडचणी आहेत. याशिवाय आमच्या समाजात सामाजिक बंधनेही खूप आहेत. या सर्व अवघड परिस्थितीतून मार्ग काढत लोकसेवा आयोगाची परीक्षा केवळ दुसऱ्या प्रयत्नात उत्तीर्ण केली, अशा भावना अजरोद्दीन काजी याने व्यक्त केल्या.

अजरोद्दीनला तीन भाऊ आहेत. एक केमिकल इंजिनीअर, दुसरा डॉक्टर आणि तिसरा वकील आहे. रचना कॉलनीतील त्यांच्या घरी सध्या जल्लोषाचे वातावरण आहे. अजरोद्दीन हा अल्पसंख्याक समाजातील जिल्ह्य़ातील पहिला आयएएस असण्याची शक्यता आहे.

वणी येथील अभिनव प्रवीण इंगोले याला सातव्या प्रयत्नांनंतर यश मिळाले. अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर तो नोकरी करत होता. २०११ पासून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. तो सध्या मुंबईला ‘सेबी’मध्ये कार्यरत आहे. त्याची पत्नी रश्मी यासुद्धा ‘यूपीएससी’ची तयारी करीत आहेत.

वणी तालुक्यातील शिरपूर गावातील सुमित रामटेके याचीही घरची परिस्थिती बेताची. गावात जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक आणि वणी येथे माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर त्याने आयआयटी- वाराणसी येथून ‘बी.टेक.’ ही पदवी घेतली. आई, वडिलांनी पदरमोड करून सुमितला उच्च शिक्षण दिले.

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्वयंप्रेरणेने अभ्यास करावा, आत्मविश्वास बाळगावा. केवळ प्रतिष्ठेसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करू  नये.

-अभिनव  इंगोले, वणी

स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी ऑनलाइन आणि डिजिटल प्लॅटफार्मचा वापर करा. मी वृत्तपत्र वाचन आणि मोबाइलचा वापर करून अभ्यास केला.

– सुमित रामटेके, वणी

हे यश खडतर परिश्रमानंतर

मिळाले आहे, परंतु आयएसएस कॅडर मिळाले नाही तर मी पुन्हा यूपीएससीची परीक्षा

देणार आहे.

– अजरोद्दीन जहिरोद्दीन काजी, यवतमाळ

‘लोकसत्ता, इंडियन एक्स्प्रेस’ पथदर्शक

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी  दैनिक ‘लोकसत्ता’ आणि ‘इंडियन एक्स्प्रेस’ पथदर्शक आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करताना आपण वृत्तपत्रांचे नियमित वाचन केले. त्याचा खूप फायदा परीक्षेत तिन्ही टप्यांवर झाल्याचे या तिघांनीही सांगितले.

मुलगा अधिकारी व्हावा हे स्वप्न!

मी काळी-पिवळी टॅक्सी चालवत होतो. त्यामुळे पोलिसांशी सतत संघर्ष व्हायचा. आपला मुलगा आयपीएस झाला तर किती रुबाब वाढेल, असे नेहमीच वाटायचे. अजरोद्दीनने यूपीएससी परीक्षेत यश मिळवून त्या मार्गावर वाटचाल सुरू केली. आपल्या चारही मुलांनी प्रतिकूल परिस्थितीत उच्च शिक्षण घेऊन कुटुंबाचे नाव मोठे केले याचा अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया अजरोद्दीनचे वडील जमीरोद्दीन काजी यांनी ‘लोकसत्ता’कडे व्यक्त केली.