देशभरासह राज्यात करोनाचा संसर्ग अद्यापही वाढत असला तरी, दुसरीकडे करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. आज दिवसभरात आढळलेल्या करोनाबाधितांपेक्षा करोनावर मात केलेल्यांची संख्या अधिक असल्याचे समोर आले आहे. राज्यात आज १९ हजार ९३२ जणांची करोनावर मात केली आहे. तर, ११ हजार ९२१ नवे करोनाबाधित आढळले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट ७७.७१ टक्क्यांवर पोहचला आहे.

देशात आजपर्यंत करोनातून बरे झालेल्यांच्या एकूण संख्येने ५० लाखांचा टप्पा ओलांडलेला आहे. मागील काही दिवसांमध्ये भारतात करोनावर मात करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. एक दिवसात ९० हजारांपेक्षा अधिक रुग्ण करोनातून बरे झाले आहेत.

तर, आज दिवसभरात राज्यात ११ हजार ९२१ नवे करोनाबाधित आढळले आहेत. तर, १८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या १३ लाख ५१ हजार १५३ वर पोहचली आहे.

राज्यातील एकूण १३ लाख ५१ हजार १५३ करोनाबाधितांमध्ये २ लाख ६५ हजार ३३ अॅक्टिव्ह केसेस, डिस्चार्ज मिळालेले १० लाख ४९ हजार ९४७ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या ३५ हजार ७५१ जणांच्या संख्येचा समावेश आहे.