Deepali Sayed : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होईल अशी चर्चा आहे. राज ठाकरेंनी एप्रिल महिन्यात एक मुलाखत दिली होती. त्यात उद्धव ठाकरेंना टाळी देण्याची भाषा केली होती. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यानंतर आता या चर्चा काही काळासाठी थंडावल्या होत्या. मात्र मागच्या काही दिवसांपासून या चर्चा पुन्हा सुरु झाल्या आहेत. संजय राऊत यांनीही राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील असे संकेत दिले आहेत. मात्र ही युती पूर्वीच व्हायला हवी होती असं मत शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी व्यक्त केलं आहे.

ठाकरे बंधूंबाबत काय म्हणाल्या दीपाली सय्यद?

“स्वर्गीय हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची पोकळी जर कुणी भरुन काढली असेल तर ती आमचे नेते आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी. नेता हा लोकांचा विचार करणारा, त्यांच्या मनातलं ऐकणारा नेता असला पाहिजे. आम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं. वारसा असेल तर तुम्ही समाजकारण, राजकारण करु शकता. कुटुंबातले वाद असतील आणि वाद संपवून एकत्र येत असतील तर चांगली गोष्ट आहे. कुठल्याही कुटुंबात असे वाद असायला नको. पण राजकारणासाठी जर तुम्ही येत असाल अर्थात या जर आणि तरच्या गोष्टी आहेत. त्यावेळी मी प्रतिक्रिया देईन.

बाळासाहेबांप्रमाणे लोकांचे प्रश्न समजून घेणारे नेते म्हणजे एकनाथ शिंदे-दीपाली सय्यद

बाळासाहेब ठाकरेंनी जे नेतृत्व केलं होतं, त्यांच्याप्रमाणे कोण नेता असेल? तर लोकांचं ऐकणं, लोकांचे प्रश्न समजून घेणं हे सगळं एकनाथ शिंदे करत आहेत. याला म्हणतात नेता. जे कुणी एकत्र येतील तेव्हा राजकीय टिपण्णी नक्कीच करेन.” असं दीपाली सय्यद यांनी म्हटलं आहे. ८० टक्के समाजकारण करणारा नेता आणि आमचा लाडका भाऊ म्हणजे एकनाथ शिंदे. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात वगैरे आहे म्हणत आहेत. पण या सगळ्यासाठी आता खूप उशीर झाला आहे. जर युती करायची होती तर आधीच व्हायला हवी होती. ते झालं नाही, बाळासाहेबांच्या मनात ही बाब होती. ते कुढत कुढत गेले, असंही दीपाली सय्यद यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बाळासाहेब ठाकरे हेच ब्रँड आहेत बाकी कुणीही नाही-दीपाली सय्यद

ठाकरे ब्रँड आहेत याबाबत कुणाचं दुमत नाही. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हेच ब्रँड आहेत. आजही एकनाथ शिंदे स्वतःला सैनिकच म्हणतात. जो काम करतो तोच ब्रँड आहे. स्वर्गीय हिंदूहृदय सम्राट हाच एक ब्रँड आहे. असंही दीपाली सय्यद यांनी म्हटलं आहे. तसंच शिवसेना एकदम भक्कपणे उभी आहे. शिवसेनेला आम्ही कधीही हरु देणार नाही. गजानन किर्तीकर जे म्हणाले असतील तर ते त्यांचं मत असेल. कुटुंबासाठी जर बंधू एकत्र येत असतील तर त्यांनी यावं. असं दीपाली सय्यद यांनी म्हटलं आहे. टीव्ही ९ मराठीशी दीपाली सय्यद यांनी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.