Jammu and Kashmir Terror Attack Updates: अलिबाग- रायगड जिल्ह्यातील काश्मीर, श्रीनगर, पेहेलगाम येथे अडकून ३९ पर्यटक अडकून पडले आहेत. त्यापैकी ३८ जण सुखरूप आहेत. सर्वांशी संपर्क प्रस्तापित करण्यात रायगड जिल्हा प्रशासनाला यश आले असून, सर्वांना रायगडमध्ये परत आणण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरु केल्या आहेत.
पनवेलच्या निसर्ग पर्यटन टूर्स कंपनीच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील ३९ जणांचा समूह काश्मीर येथे दहा दिवसांच्या सहलीसाठी गेला होता. यात पनवेल मधील ३१ तर उरणमधील २, खारघरमधील ४ तर तेलीपाडा मुळेखंड येथील २ पर्यटकांचा समावेश होता. पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात यातील खांदा कॉलनी येथे राहणाऱ्या दिलीप देसले हे मृत्यू झाला. तर पनवेल येथील सुबोध पाटील हे जखमी झाले आहेत.
देसले यांचा मृतदेह बुधवारी एअर इंडीयाच्या विशेष विमानाने मुंबईत आणण्यात आला आहे. तर जखमी झालेल्या सुबोध पाटील यांना लष्कराच्या हॅलिकॉप्टरच्या मदतीने एअरलिफ्ट करून श्रीनगर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थीर आहे. इतर सर्व प्रवासी सुखरूप आहेत. सर्वांशी संपर्क झाला असून, त्यांना परत आणण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.
तर दुसरीकडे काश्मीर मध्ये अडकून पडलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी हेल्प लाईन नंबर जारी केले आहेत. अडकून पडलेल्या पर्यटकांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी ०२१४१-२२२११८, २२२०९७ या लॅण्डलाईन क्रमांकावर अथवा ८२७५१५२३६३, ९७६३६४६३२६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.