अलिबाग – रायगड जिल्ह्यात गेल्या मुसळधार पावसाने हजेरी लावली, किनारपट्टीवरील तालुक्यांमध्ये पावसाचा जोर दिसून आला. त्यामुळे जनजिवन विस्कळीत झाले. दरम्यान हवामान विभागाकडून येत्या ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
जिल्ह्यात अलिबाग, मुरुड, रोहा, श्रीवर्धन, माणगाव, म्हसळा आणि उरण या तालुक्यांना पावसाचा जोरदार तडाखा बसला, या तालुक्यांमध्ये पावसाची संततधार कायम होती. अधुनमधून वादळी वाऱ्यांसह पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. त्यामुळे सखल भागात पाणी साचणे, वृक्ष उन्मळून पडणे, वीज पुरवठा खंडीत होणे या सारख्या घटना घडल्या.
जिल्ह्यात बुधवारी सकाळी आठ वाजे पर्यंत संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ९१ मिमी पावसाची नोंद झाली. रोहा येथे सर्वाधिक १५९ मिमी पाऊस नोंदवला गेला. तळा १५० मिमी, मुरुड १२४ मिमी, पेण १२० मिमी, माणगाव ११५ मिमी, श्रीवर्धन ११६ मिमी, म्हसळा १०९ मिमी, तर अलिबाग येथे ९६ मिमी पावसाची नोंद झाली.
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. त्यामुळे आंबा, सावित्री, कुंडलिका, पाताळगंगा नद्या नाल्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. बुधवारी सकाळच्या सत्रात कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली होती. त्यामुळे रोहा शहर आणि नदी किनाऱ्यावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. भिरा धरणातून विसर्ग सुरु असल्याने कुंडलिका नदी दुथडी भरून वाहत होती. बुधवारी दुपार पर्यंत जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे जनजीवन विस्कळीत होते.
दरम्यान प्रादेशिक हवामान विभागाकडून गुरुवार दिनांक २४ आणि शुक्रवारी दिनांक २५ जुलैसाठी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभागाने नदी किनाऱ्यांवरील तसेच डोंगर उतारावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. आपत्कालीन परिस्थितीत ०२१४१-२२२११८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.