देशभर लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांमध्ये इनकमिंग-आऊटगोईंग चालू आहे. गेल्या काही महिन्यांपासून देशभरातील अनेक विरोधी पक्षांमधील कित्येक नेत्यांनी भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांमध्ये प्रवेश केला आहे. तर सत्ताधारी पक्षावर नाराज असलेल्या काही नेत्यांनी आपला मोर्चा विरोधी पक्षांकडे वळवला आहे. महाराष्ट्रातही अशीच काहीशी परिस्थिती आहे. निवडणुकीच्या आधी काँग्रेसला गळती लागल्याचं पाहायला मिळालं होतं. तर दोन वर्षांपूर्वी शिवसेना पक्ष फुटला आणि पक्षाचे दोन गट पडले. यापैकी एक गट सध्या भाजपाबरोबर सत्तेत बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची परिस्थितीदेखील सारखीच आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीचं तिकीट न मिळाल्याने, अथवा तिकीट मिळावं या उद्देशाने अनेक नेत्यांनी पक्षांतर केलं आहे. अशातच भाजपाचा एक मोठा नेता शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

जळगावचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील ठाकरे गटात प्रवेश करून मनगटावर शिवबंधन बांधणार असल्याचं बोललं जात आहे. पाटील हे खासदार संजय राऊतांच्या भेटीसाठी मुंबईत दाखल झाल्याचं वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी प्रसिद्ध केलं आहे. भाजपाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उन्मेश पाटील यांचं तिकीट कापलं आहे. पाटील यांच्याऐवजी भाजपाने जळगावातून स्मिता वाघ यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळे या मतदारसंघातून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी उन्मेश पाटील शिवसेनेच्या ठाकरे गटात जाणार असल्याचं बोललं जात आहे.

शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की, उन्मेश पाटील ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत का? त्यावर संजय राऊत म्हणाले, भाजपावर त्यांची नाराजी असेल, त्यांनी केवळ आमच्याकडे भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ते पक्षात प्रवेश करणार आहेत की नाही याबाबत माझ्याकडे माहिती नाही.

खासदार गोडसेंसाठी ठाकरे गटाचे दरवाजे खुले? संजय राऊत म्हणाले…

उन्मेश पाटलांप्रमाणे नाशिकचे शिंदे गटातील खासदार हेमंत गोडसेदेखील पक्षावर नाराज असल्याचं बोललं जात आहे. पक्षाने त्यांना अद्याप उमेदवारी दिलेली नाही. तसेच निवडणूक तोंडावर आली तर महायुतीने या जागेबाबत निर्णय घेतलेला नाही. उलट नाशकात हेमंत गोडसेंच्या उमेदवारीला भाजपा आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील पदाधिकाऱ्यांनी विरोध केला आहे. त्यामुळे हेमंत गोडसे सध्या एकनाथ शिंदेंवर नाराज असल्याची चर्चा आहे. यावरून प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंनी संजय राऊत यांना विचारलं की, हेमंत गोडसेंसाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे दरवाजे उघडे आहेत का? यावर खासदार संजय राऊत म्हणाले, गद्दारांसाठी आमचे दरवाजे बंद आहेत.

हे ही वाचा >> “१७ रुपयांची साडी वाटून…”, बच्चू कडूंचा नवनीत राणांवर हल्लाबोल; महायुतीतलं वातावरण तापलं

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजय राऊत म्हणाले, खासदार गोडसे हे सध्या शिंदे गटात असले तरी आम्ही त्यांना निवडून आणलं होतं. परंतु, आता कोणत्याही गद्दारासाठी आमच्या पक्षाचे दरवाजे उघडे नाहीत. तुम्ही आमचा दरवाजा ठोठावलात, अंगणात बसलात, छाती बडवली तरीदेखील गद्दारांसाठी आमचे दरवाजे उघडले जाणार नाहीत. आम्ही भविष्यात गद्दारांसाठी दरवाजे उघडले तर मला वाटतं की, आमच्या निष्ठावंतांचा अपमान होईल. अनेक निष्ठावान, प्रामाणिक, स्वाभिमानी जनता आणि स्वाभिमानी शिवसैनिक मिळून आम्ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात एकत्र आलो आहोत. गद्दारांसाठी दरवाजे उघडले तर या सर्व निष्ठावंतांचा अपमान होईल.