Uddhav thackeray on hindi compulsion : राज्यात पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र याला विरोधकांकडून जोरदार विरोध करण्यात आला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत ५ जुलै रोजी मोर्चा काढायचा निर्णयही जाहीर केला. यादरम्यान आज राज्य सरकारने १६ एप्रिल आणि १७ जूनचे त्रिभाषा सूत्राचे दोन्ही निर्णय रद्द केल्याची घोषणा केली आहे. सरकारच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत निर्णय रद्द केल्याचे जाहीर केले. यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील पत्रकार परिषद घेतली. यावेळी ठाकरे म्हणाले की, “आम्ही भूमिका घेतली की आमचा भाषेला विरोध नाही पण सक्तीला विरोध आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे इथे राहणाऱ्या इतर भाषिकांनाही कळलं की आपल्या भाषेविरोधात नाही तर या राज्यातील मातृभाषेवरती जी सक्ती केली जाते, त्या सक्तीच्या विरोधात हे आंदोलन आहे. त्यामुळे फूट पडली नाही.”

“या सरकारचा हाच प्रयत्न होता, मराठी माणसाची फूट आपल्याला लाभदायक ठरेल हे त्यांना वाटलं होतं. आज हे आंदोलन केल्यानंतर त्यांना कल्पना नव्हती की मराठी माणूस एवढा एकवटेल. आज हे आंदोलन केल्यानंतर आता मराठी माणूस एकत्र होऊ नये, ५ तारखेला जो मोर्चा ठरवला तो होऊ नये, मराठी माणूस एकत्र येताच कामा नये, म्हणून जीआर रद्द केला,” असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान त्रिभाषा सूत्राचा निर्णय हा तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच घेतला होता आणि त्यांच्याच काळात घेतला गेला, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांना सांगितले .तसचे राज्य सरकारचे १६ एप्रिल २०२५ आणि १७ जून २०२५ रोजीचे दोन्ही शासन आदेश रद्द करीत असल्याचे जाहीर केले. याबरोबर त्रिभाषा सूत्रासंदर्भात ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेत एक समिती गठीत करीत असल्याची घोषणा देखील मुख्यमंत्र्‍यांनी केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते.