भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हे सोशल मीडियावर चर्चेत असणारं जोडपं आहे. अनेकदा विराट आणि अनुष्काने अनेक सामाजिक विषयांवर आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर भाष्य केलं आहे. स्वच्छ भारत अभियानासंदर्भातही या दोन्ही सेलिब्रेटींनी वारंवार आपला पाठींबा दर्शवला आहे. आपल्या चाहत्यांमध्ये ‘विरुष्का’ या नावाने प्रसिद्ध असणारी जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली गाडीतून प्रवास करताना, एक व्यक्ती प्लास्टिकचा कचरा रस्त्यावर फेकत असल्याचं अनुष्काच्या लक्षात आलं. यानंतर अनुष्काने त्या व्यक्तीची चांगलीच खरडपट्टी काढली. विराटने या घटनेचा व्हिडीओ काढत आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर टाकला आहे. त्याच्या या व्हिडीओला अनेकांनी आपली पसंती दर्शवली असून चाहत्यांनी अनुष्काचं कौतुक केलं आहे.

यानंतर विराट कोहलीनेही आपल्या ट्विटर अकाऊंटवर लोकांना स्वच्छतेसाठी पुढाकार घेण्याचं आवाहन केलं आहे. कित्येक लोकं आपल्यासमोर होत असलेली घाण पाहून शांत राहण्याचं पसंत करतात. मात्र आपल्यासमोर कोणीही कचरा करत असेल तर ते थांबवण्याचं धाडसं आपल्यात असायला हवं असं विराटने म्हटलं आहे.

याआधीही विराट आणि अनुष्का यांनी पर्यावरण बचाव, स्वच्छ भारत यांसारख्या अनेक अभियानांमध्ये सहभाग नोंदवला आहे.